
कोपरगाव प्रतिनिधी
पहिल्याच पावसाने कोपरगाव शहरातील समतानगर परिसरातील नगरपरिषद सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार पूर्णपणे उघड झाला आहे. पहिल्याच अल्प पावसात परिसरातील संपूर्ण कच्चे रस्ते चिखलमय झाले असून रस्त्यांवर चालणे देखील कठीण झाले आहे.आम्ही सातत्याने मुरूम टाकण्याच्या केलेल्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी उदासीनता दाखवल्यामुळे समतानगर परिसरातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना चिखल तुडवत ये जा करावी लागत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी केली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी समतानगर परिसरातील भूमिगत गटारींचे काम प्राधान्याने पूर्ण करून घेऊन कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याची कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगरपरिषदेकडे मागील चार महिन्यांपासून वारंवार मागणी केली जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या वेळकाढू आणि बेजबाबदार धोरणामुळे पहिल्याच किरकोळ पावसात परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखल तयार झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शाळा सुरू झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना याच चिखलातून आणि घाणीतून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. या चिखलातून दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. चार महिने वारंवार मागणी करूनही पालिकेने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने सत्ताधाऱ्यांच्या या अत्यंत उदासीन भूमिकेबद्दल समता नगरमधील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
समतानगर परिसरात ज्या ठिकाणी चिखल झाला आहे त्या ठिकाणी आणि जिथे मुरूम टाकण्याची अत्यंत गरज आहे तिथे नगरपरिषदेने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने मुरूम टाकून रस्ते पूर्ववत करावेत. पावसाळा संपेपर्यंत कुठलाही रस्ता खोदू नये पावसाळा संपल्यानंतर मग काम चालू करावी चांगले रस्ते फोडू नयेत.सुविधांच्या नावाखाली नगरपरिषद नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करीत आहे. तर मग नागरिकांना देखील त्या स्वरुपात सुविधा का मिळत नाही असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.


