
कोपरगाव प्रतिनिधी
शेतक-यांचे हित जपण्यासाठी आम्ही सर्वानुमते तुम्हाला सभापतीपदाची खुर्ची दिली. परंतु शब्द देवून तो कधीच न पाळणे ही नेहमीची विश्वासघातकी प्रवृत्ती तुमच्या नेत्याच्या रक्तात आहे. त्यामुळे तुम्ही सभापतीपद सोडले नाही. परंतु आम्ही त्याचा विचार न करता मोर्विस व रांजणगाव देशमुख उपबाजार समिती सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी करीत होतो. तुम्ही डोळेझाक करीत असल्याने आम्ही सामुहिक राजीनामे दिले. आता तुम्ही उपसभापतीपदाची खुर्ची देखील घ्या मात्र शेतक-यांच्या हिताकडे दुर्लक्ष करू नका. असा सल्ला कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सभापती साहेबराव रोहोम यांना दिला.
ते म्हणाले कि, पश्चिम भागातील व पोहेगाव परिसरातील ११ गावातील शेतकरी तुमचा निषेध करीत असल्याने तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे तुम्ही नेत्याच्या सांगण्यावरून प्रेस नोट देत आहात. मी वर्षापूर्वी सोडलेल्या उपसभापतीच्या खुर्चीवरही तुम्ही बसा. मात्र निर्णय शेतकरी हिताचे घ्या.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या मोर्विस व रांजणगाव देशमुख उपबाजार समित्यांचे भूमिपूजन होवूनही सव्वा वर्षात या उपबाजार समित्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत. पोहेगावची बाजार समिती फक्त कागदावरच मंजूर आहे. त्यामुळे उपसभापतीच्या खुर्चीला कोल्हे गटाच्या विद्यमान सदस्याच्या नावाची पाटी लावून कोल्हे गटाला जबाबदारीची जाणीव करून दिली.आम्हाला आणि आमच्या नेत्याला खुर्चीची हाव नाही. शेतकरी हित जपले जावे या उद्देशातून आम्ही कारभार करीत आलो. आमच्या मोठेपणामुळे तुम्हाला सभापतीची खुर्ची मिळाली. तुम्ही त्याचा गैरवापर केला. सभापती साहेबराव रोहोम हे कोल्हेंच्या नेतृवाखाली प्रभावीपणे भ्रष्टाचाराचे करीत असलेले रेकॉर्ड आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही स्वतःहून सामुहिक राजीनामे दिले.आम्हाला जर खुर्चीची आशा-अपेक्षा असती तर आम्ही सामुहिक राजीनामे कशाला दिले असते? तुमच्यावर अविश्वास ठराव आणला असता.आम्हाला तुमच्यासारखी खुर्चीची हाव नाही. आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हिच आमची मोठी खुर्ची आहे. कोल्हेंची भूमिका नेहमीच शेतकरी विरोधी राहिली आहे.त्यांच्या कार्यकाळातील शेतकरी आंदोलन,दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवलेले तालुक्यातील शेतकरी, सिंचनासाठी केवळ अडीच किलोमीटर पर्यंतच पाट पाणी, पोहेगाव परिसरातील शेतकऱ्यांना जिंवंतपणी सरणावर बसण्याची वेळ, तीन वेळा वाहून गेलेला दुर्लक्षित मंजूर बंधारा, शेतकऱ्यांच्या हक्काच्या निळवंडेच्या पाण्याबाबत दुट्टपी भूमिका, उजनी उपसा जलसिंचन योजनेबाबत नेहमीची उदासीनता, कोपरगाव तालुक्याचे हक्काचे तालुक्याबाहेर घालाविलेले १३२ के.व्ही.सबस्टेशन असे एक ना अनेक शेतकरी विरोधी पराक्रम करणाऱ्या कोल्हेंना शेतकऱ्यांनी पंचायत समिती आणि विधानसभेपासून दूर ठेवले आहे. त्यातून कोणताही बोध न घेता त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या कारभारातून पुढे सुरु असल्यामुळे आगामी काळातही शेतकरी त्यांना पंचायत समिती आणि विधानसभेपासून दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही.


