
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवार (दि.२२) रोजी कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात आली असून त्याबाबत नागरिकांना अधिकृत पावत्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे. करण्यात आलेली वाढ थोडी थोडकी नव्हे तर दुप्पट, तिप्पट, चौपट करण्यात आली असून हि करवाढ सर्वसामान्य कोपरगावकरांना पेलवणारी नाही. या वाढीव कर पट्टीमध्ये मालमत्तांचे वर्गीकरण, निर्धारीकरण कसे केले याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळलेली आहे. वाढीव घरपट्टी (मालमत्ता कर) मध्ये अनेक त्रुटी आणि मोठ्या प्रमाणावर विसंगती आहेत.त्याबाबत या करवाढीला हरकत घेण्यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला हजारो नागरिकांनी प्रतिसाद देत न्याय मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविल्यामुळे कोपरगावकरांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. वाढीव दराने आकारण्यात येणारी घरपट्टी (मालमत्ता कर) रद्द करावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरु असून मागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी निवेदन दिले असून ते देखील याबाबतीत सकारात्मक आहेत.परंतु शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून कोपरगावकरांना लवकरात लवकर न्याय मिळावा हा देखील या धरणे आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येवून या धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्या बरोबरच नगराध्यक्षांनी कोपरगाव शहरात ७२६ ढापे टाकल्याचा दावा केला असला तरी नगरपालिका प्रशासनाकडे याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. या ७२६ ढाप्यांचा संपूर्ण हिशोब जाहीर करावा. ढापे कुठे टाकले, किती खर्च आला, महसूल, उत्पन्न आणि ढापे टाकण्याच्या परवानग्या नागरिकांसमोर जाहीर करावे. १५ मे रोजी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे पाचही तळे पूर्ण क्षमतेने भरून घेतली होती तर मग २१ दिवसांच्या आत सर्वच तळ्यांनी तळ कसा गाठला याचा सविस्तर खुलासा नागरिकांना द्यावा. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी कोपरगाव शहरात सुरु असलेली रस्ते खोदाई तत्काळ थांबवावी. शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवन याचा विचार करून योग्य नियोजन करावे अशा प्रमुख मागण्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या हितासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनास हजारो नागरिकांसह, जेष्ठ नागरिक सेवा मंच, कोपरगाव तालुका मुस्लीम विकास कमिटी, बुद्धिस्ट यंग फोरम (फोर्स) अशा अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.


