
कोपरगाव प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षावर निराधार आरोप व टीका करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोपरगावच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. एकीकडे राज्यातील महायुती सरकारमध्ये आमदार काळे यांनी सत्तेचा उपभोग घ्यायचा. त्यांच्या पक्षश्रेष्ठींना देखील फसवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या चेले चपाट्यांनी भारतीय जनता पक्षावर पातळी सोडून टीका करायची, हा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आला आहे अशी परखड भूमिका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी व्यक्त केली आहे.आमदार आशुतोष काळे यांचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी भारतीय जनता पक्षाबाबत केलेली वक्तव्ये अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह आहेत. भारतीय जनता पार्टीसोबत मांडिला मांडी लावण्याचे एवढे वितुष्ट वाटत असेल तर तसे आमदार काळे यांना सांगा आणि भूमिका जाहीर करा. भारतीय जनता पक्षाने दाखविलेल्या मोठेपणामुळे आणि कोल्हे कुटुंबाच्या सकारात्मक भूमिकेमुळेच आशुतोष काळे यांना आमदारकीची संधी मिळाली, हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. अन्यथा त्यांची राजकीय परिस्थिती काय असती, हे जनतेला चांगलेच माहीत असल्याचे आढाव यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्यापूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी स्वतःला मिळालेली आमदारकी ही भाजपमुळेच शक्य झाली होती, याचे भान ठेवावे. जर भारतीय जनता पक्षाविषयी एवढीच नाराजी असेल, तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याची हिंमत दाखवावी. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते, हे स्पष्ट होईल, असे आव्हानही आढाव यांनी दिले. सय्यद यांचा बोलविता धनी त्यांचे नेते आहेत का हे ही त्यांनी स्पष्ट करावे असा इशारा आढाव यांनी दिला आहे.
नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तातडीने जाहीर माफी मागावी. अन्यथा पक्षाचे वरिष्ठ नेते याची गंभीर दखल घेतील आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. भारतीय जनता पक्षावर टीका करून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलावे, असा सल्लाही आढाव यांनी दिला.


