
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या ऊर्जेचे केंद्र असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन आणि हरित कोपरगाव या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणारा ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे केवळ एक उद्यान नसून शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि बालकांसाठी विरंगुळा, आरोग्य व सामाजिक संवादाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या उद्यानाचे सुशोभीकरण झाल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून उद्यानाचा परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनणार आहे. मा.आ. स्नेहलताताई कोल्हे व आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रसाद आढाव व सोनल अजमेरे यांनी प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांना दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
उद्यानातील पायाभूत सुविधा, हिरवळ, प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था तसेच सौंदर्यवृद्धीसाठी आवश्यक विविध कामांना या निधीमुळे गती मिळणार आहे.चार वर्षे प्रशासकीय काळात ज्यांच्या हातात सर्व कारभार होता त्यांनी केलेल्या दुर्लक्षाने या उद्यानात मोकाट जनावरे कोंडून नुकसान करण्यात आले होते तसेच मद्यपींचा धुडगुस या परिसरात होता त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केलेल्या या कामामुळे नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक ठिकाणांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्ष पराग संधान यांनी उद्यानाच्या विकासासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जपत, हे उद्यान भविष्यात कोपरगावच्या सौंदर्याचा आणि पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रसाद आढाव, सोनल अजमेरे, डॉ.अमोल अजमेरे, संजय जगदाळे, श्रीकांत राठी, दत्तोबा जोर्वेकर, राहुल अजमेरे, शितल अजमेरे, परेश आढाव, सलीम अत्तार, राकेश काले, समीर गवळी, इलियास शेख,सलमान कुरेशी, शैलेश नागरे, रोहित कनगरे, अक्षत अजमेरे, रवींद्र लचुरे, अमोल बागुल, अर्जुन माकोने, स्वराज सूर्यवंशी, अनिकेत रोडे, चैतन्य जगदाळे, तोहीद कच्छी, सुनिताताई जगदाळे, सुनीताताई मखिजा,दिपाताई काळवाघे, कीर्तीताई पोरवाल,भुसारी भाभी आदींसह मान्यवर उपस्थित होते.


