
कोपरगाव प्रतिनिधी
ऐन उन्हाळ्यात कोळपेवाडी येथील विद्युत उपकेंद्रातील पाच एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाला. शेतातील पिके, जनावरांचे व नित्य वापराचे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला. घरातील विद्युत उपकरणे चालेनाशी झाली. उर्वरीत ट्रान्सफार्मरद्वारे कोळपेवाडी, कोळगाव थडी, शहाजापूर, सुरेगाव या चार गावांना कसाबसा विजपूरवठा करावा लागत होता. त्यातच प्रचंड वाढलेली उष्णता आणि लांबलेला पाऊस यामुळे विजेची मागणी वाढली होती. अशा कठीण प्रसंगात आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने हालचाली केल्या. वरिष्ठ अधिका-यांना सुचना दिल्या. नवा ट्रान्सफार्मर वेळेत दाखल झाला. वीज पुरवठा सुरळीत झाला अन सर्वांचा जिव भांड्यात पडला.अचानक निर्माण झालेल्या या अडचणीमुळे कृषी पंपांना मर्यादित विजपुरवठा होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. कडाक्याच्या उन्हाळ्यात शिल्लक पाणी कसे बसे वापरून जगवलेला बारमाही ऊस, फळबागा व चारा पिकांच्या सिंचनासाठी पाणी असूनही पाणी देता येत नव्हते. शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने नवा ट्रान्सफार्मर देण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार शनिवार (ता.२०) रोजी नवा पॉवर ट्रान्सफार्मर सबस्टेशनमध्ये दाखल झाला. रविवार (दि.२१) पासून या सर्व परिसराला पूर्णदाबाने विजपूरवठा सुरू झाला. कोळपेवाडी, कोळगाव थडी, शहाजापूर, सुरेगाव आदी गावातील वीज ग्राहकांनी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले.


