
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव व राहाता तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निळवंडे धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्याचा प्रभावी वापर करून परिसरातील गावतळे, पाझर तलाव तसेच जलसाठे भरून देण्यात यावेत, अशी मागणी विधानपरिषद सदस्य आ. विवेक कोल्हे यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी केवळ नदीपात्रातून वाहून जाऊ न देता त्याचा नियोजनबद्ध वापर करून कोपरगाव व राहाता तालुक्यातील गावतळे, पाझर तलाव आणि लघु जलसाठे भरल्यास भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होईल. त्याचबरोबर विहिरी, बोअरवेल आणि इतर पाणीस्रोतांची पाणीधारण क्षमता वाढून शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाला मोठा दिलासा मिळेल.आ. विवेक कोल्हे यांनी सांगितले की, पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा योग्य नियोजनाने वापर केल्यास भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. जलसंधारणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि दूरदृष्टीची योजना असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.यासाठी संबंधित सिंचन विभाग, महसूल प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी समन्वय साधून तातडीने सर्वेक्षण करावे तसेच ज्या गावतळे व पाझर तलावांमध्ये ओव्हरफ्लो पाणी वळविणे शक्य आहे, तेथे आवश्यक उपाययोजना करून जलसाठे भरावेत, अशी मागणीही त्यांनी केली.ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत आ. विवेक कोल्हे यांनी प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी या पाण्यासाठी मागणी आ. विवेक कोल्हे यांच्याकडे केली असून त्यांनी तातडीने या मागणीची दखल घेत कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.


