Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सवात ग्रामीण भागाला अंधारात का ठेवता? सायंकाळचे भारनियमन तातडीने बंद करा!!- गोदावरी...

गणेशोत्सवात ग्रामीण भागाला अंधारात का ठेवता? सायंकाळचे भारनियमन तातडीने बंद करा!!- गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीपराव शिंदे

जेऊर कुंभारी वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येणाऱ्या भारनियमनामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यातच परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जेऊर कुंभारी, चांदेकसारे, कोकमठाण यांसह ग्रामीण भागातील सायंकाळचे भारनियमन तातडीने बंद करून अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी जेऊर कुंभारी येथील गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीपराव शिंदे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली मागणी मांडली आहे.
सध्या गावोगावी गणपती बाप्पांचे आगमन झाले असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सायंकाळच्या वेळी आरती, भजन, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. मात्र, नेमक्या याच वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने उत्सवाच्या आनंदावर विरजण पडत आहे. ग्रामीण भागात गणेशोत्सव सुरू असताना सायंकाळचे भारनियमन कायम ठेवण्याचे कारण काय, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
बिबट्याचा वावर वाढला; अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी, कोकमठाण आणि परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायंकाळनंतर शेतातून घरी परतणारे शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच गणेशोत्सवातील कार्यक्रमांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारनियमनामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील नागरिकांनाही सुरक्षित वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी वीजपुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे. बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी होणारे भारनियमन नागरिकांच्या चिंतेत भर घालत असल्याने महावितरणने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महावितरणने तातडीने निर्णय घ्यावा
गणेशोत्सवाचा उत्साह, नागरिकांची सुरक्षितता आणि ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेतील भारनियमन तातडीने बंद करावे. ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करून दिलासा द्यावा, अशी मागणी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीपराव शिंदे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!