
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ मोठ्या भूलथापा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा एक एक भ्रष्टाचार आता उघड होत आहे. नगराध्यक्षांनी शहरात नाले सफाई आणि ७२६ ढापे टाकल्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र कोपरगाव शहरात पडलेल्या पहिल्याच अल्प पावसात नागरिकांच्या घरात आणि दुकानात पावसाचे आणि तुंबलेल्या गटारींचे पाणी शिरल्याने कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे ढापे पहिल्याच पावसात उघड झाले असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी केली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई आणि गटारींवर तब्बल ७२६ ढापे टाकल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला असताना पहिल्या पावसात नगराध्यक्षांचा दावा वाहून गेला आहे. ढापे टाकण्याच्या कामात भ्रष्टाचार केल्यामुळे पहिल्याच पावसात नागरिकांच्या घरात, दुकानात पावसाचे आणि गटारींचे पाणी शिरले आहे. विकास कामांच्या नावाखाली रस्ते, नाल्या खोदून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक प्रभागात तुंबलेल्या गटारी, कचऱ्याचे पडलेले ढिगारे आणि गटारींवर ढापे नसल्याने गटारीचे आणि शौचालयाचे पाणी परिसरात सर्वत्र वाहू लागले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आज नागरिकांवर हि वेळ ओढवली असून सत्ताधाऱ्यांचा नाले सफाईचा गाजावाजा म्हणजे गजर गाड्याचा आणि निवद…. असा प्रकार असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी केली आहे.


