
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ मध्ये पणन महासंघमार्फत सुरू केलेल्या भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने खरेदी केलेल्या मका पिकाची थकीत रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, अशी मागणी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सदर दिलेल्या निवेदनात आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या धोरणानुसार शेती पिकांचे हमीभाव निश्चित करण्यात आले असून मकासाठी प्रतिक्विंटल २४०० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई मार्फत भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत ७ मार्च २०२६ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. मात्र ८ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत केंद्र व राज्य शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत एका केंद्रावर ८ मार्च ते ३० एप्रिल पासून २२८ शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ६२ लाख ५६ हजार ४०० रुपयांची रक्कम प्रलंबित असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून खरीप हंगामाच्या पूर्वतयारीवर त्याचा परिणाम होत आहे.
सध्या राज्यात खरीप हंगामाच्या मशागती सुरू असून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व इतर शेती साहित्य खरेदीसाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची प्रलंबित देयके तात्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश द्यावेत,अशी विनंती आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


