
जेऊर कुंभारी वार्ताहर
आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र रौळस येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने चांदेकसारे येथे अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या सेवेची परंपरा जपत ग्रामस्थांनी दिंडीतील वारकऱ्यांचे आदरातिथ्य करून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश दिला.
यावेळी वारकऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर हरिनामाच्या अखंड गजरात हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. हरिपाठानंतर सर्व वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करून वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्यात आली.
“ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या प्रसंगी जेऊर कुंभारी येथील भजनी मंडळाचे कानिफनाथ वक्ते, भानुदास वक्ते, दिगंबर वक्ते तसेच ग्रामस्थ
राजेंद्र चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, भिकाभाऊ चव्हाण, महेश चव्हाण, रावसाहेब होन, सुनिल वक्ते, नवनाथ चव्हाण,तुकाराम चव्हाण, महेंद्र चव्हाण
यांच्यासह युवक, महिला भगिनी आणि वारकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाची सेवा हीच ईश्वरसेवा मानत जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे मनापासून स्वागत केले. हरिपाठ, महाप्रसाद आणि सेवाभावी आदरातिथ्यामुळे वारकऱ्यांनी ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी जपलेली वारकरी सेवेची ही परंपरा उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरली असून, सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


