Wednesday, July 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगाव किंवा शिर्डीला महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय सुरु करा आमदार आशुतोष काळेंची...

कोपरगाव किंवा शिर्डीला महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय सुरु करा आमदार आशुतोष काळेंची सरकारकडे मागणी!!

कोपरगाव प्रतिनिधी

महावितरणचे सर्कल कार्यालय कोपरगाव मतदार संघापासून अहिल्यानगर येथे जवळपास ११० किलोमीटर दूर अंतरावर असल्यामुळे स्थानिक पातळीवरील कामांमध्ये प्रचंड दिरंगाई होत असून अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहत आहेत. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे महावितरणच्या कारभाराला गती मिळावी व उत्तरेच्या तालुक्यातील वीज ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय कोपरगाव किंवा शिर्डी या ठिकाणी सुरु करावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधीमंडळात सरकारकडे करून उर्जा विभागाच्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांबाबत विधानसभेत जोरदार आवाज उठवला. महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय कोपरगाव किंवा शिर्डीला सुरु करणे, शहरातील भूमिगत वीजवाहिन्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, वीज ग्राहकांचा स्मार्ट मीटर बसविण्यास होत असलेला विरोध यांसह वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांकडे आमदार आशुतोष काळे यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले.आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहरातील संजयनगर, सुभाषनगर, गांधीनगर, हनुमाननगर आणि गजानन नगर यांसारख्या अनेक भागात सर्वसामान्य आणि रोजंदारीवर काम करणारे, मोलमजुरी करणारी असंख्य कुटुंबे राहतात. या दाट लोकवस्तीच्या भागात वीज वाहिन्यांच्या विजेच्या खांबांमध्ये वीज प्रवाह उतरत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोपरगाव शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याची गरज असून या भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भविष्यात अनुचित घटना घडू नये याकरिता वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.
मतदार संघातील अनेक गावात शेती पंपांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना सर्पदंश, बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राण्यांचे हल्ले अशा जीवघेण्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालणारी ही रात्रीची वीज बंद करून शेती पंपांना दिवसा वीज देण्यासाठी शासनाने सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून मागेल सौर उर्जा पंप योजना सुरु केली आहे. मात्र सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर होवून अनेक दिवस उलटूनही सौर उर्जा प्रकल्पांचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहेत. सौर उर्जा प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे जेणेकरून शेतकऱ्यांची जीवघेण्या रात्रीच्या त्रासातून मुक्तता होईल.तसेच शासनाने ७.५ एचपी पर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. तरी देखील कोपरगाव मतदार संघात महावितरणकडून काही शेतकऱ्यांना ७.५ एचपी वीज पंप धारकांना सर्रासपणे वीज बिले दिली जात आहेत ती बिले देण्यात येवू नये.
स्मार्ट मीटर बाबत नागरीकांच्या तक्रारी आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर दुप्पट तिप्पट दाखवला जावून वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.स्मार्ट मीटरचा पेड रक्कम संपल्यानंतर वीज पुरवठा आपोआप खंडीत होत असल्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची नागरीकांची इच्छा नसतांनाही नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, विश्वासात न घेता महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. त्यामुळे नागरीकांनामध्ये तीव्र नाराजी पसरली असून शासनाने या बाबीची दखल घेऊन स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी किंवा जनतेमध्ये जनजागृती करावी. तसेच महावितरणमध्ये कुशल,अकुशल, लाईन कर्मचारी आणि सबस्टेशन ऑपरेटर अशा अनेक कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे आमदार आशुतोष काळे यांनी सरकारचे लक्ष वेधले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!