
कोपरगाव प्रतिनिधी
जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेऊन कोपरगावकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला केल्या आहेत.
संपूर्ण जून महिना कोरडा ठाक गेल्यामुळे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून कोपरगावकरांना नियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या दिवसात वाढ केल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभ्गाकडे आग्रही मागणी केली होती. त्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या साठवण तलावांमधील पाणी साठा कमी झाला आहे ते सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या आणि कोपरगाव शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
तसेच ग्रामीण भागातील ज्या गावातील पाणी पुरवठा योजनांचे साठवण तलावांचा पाणीसाठा कमी झाला आहे ते साठवण तलाव देखील या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.


