
कोपरगाव प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरणाबाबत बोलताना आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्यभर ‘महिला शेतकरी नोंदणी अभियान’ राबविण्याची मागणी केली.ते म्हणाले,महिला शेतकरी नोंदणी अभियान आपण राज्यभर राबविले पाहिजे.२२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात या अभियानाची सुरुवात करावी. या माध्यमातून जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी.
यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांचेही कौतुक केले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासातील भाडे सवलत तसेच ‘ड्रोन दीदी’ उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम करण्यासाठी शासनाने उचललेली पावले महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
तसेच महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करून ती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला बचत गटांना कृषी उद्योगांशी जोडण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत. ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक शेती, प्रक्रिया उद्योग तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करावा, असेही त्यांनी सांगितले.महिला शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) यांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करावी, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तसेच निर्यातीच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.याशिवाय एकल, विधवा, परित्यक्ता, भूमिहीन महिला शेतकरी तसेच शेतमजूर महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देताना त्यांच्यासाठी विशेष निधी व अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. सिंचनासह कृषी क्षेत्राशी संबंधित विविध योजनांवर या विशेष अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आमदार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.


