
कोपरगाव प्रतिनिधी
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात प्रवरा अर्थात विखे कारखान्याकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात असून, न्यायालयीन तसेच आर्थिक पातळीवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी केला आहे. मात्र या सर्व अडचणींवर मात करत गणेश कारखान्याची लढाई प्रत्येक स्तरावर लढत असल्याची माहिती त्यांनी दिली.
२०२४ मध्ये प्रवरा अर्थात विखे कारखान्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. साखर आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली. गळीत हंगाम शुभारंभाच्या दिवशी संचालक मंडळाला नोटिसाही बजावण्यात आल्या.मात्र डिसेंबर २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने प्रवरा कारखान्याच्या दोन्ही याचिका फेटाळून लावत गणेश कारखान्याच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही आर्थिक व्यवस्थापन, कर्ज प्रक्रिया तसेच ऊस पळवापळवीच्या माध्यमातून गणेश कारखान्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
उच्च न्यायालयातील दोन्ही याचिका फेटाळल्यानंतर प्रवरा कारखान्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २१ एप्रिल रोजी हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डावर आला. त्यावेळी पुढील आदेश होईपर्यंत कोणताही बोजा निर्माण करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले.
विशेष म्हणजे, २० एप्रिल रोजीच गणेश कारखान्याला बँकेकडून कर्ज मंजूर झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मॉर्गेज लोनची पुढील प्रक्रिया थांबली. सध्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे मेंटेनन्स सुरू असून, गळीत हंगामाच्या पूर्वतयारीला आर्थिक अडचणींमुळे निधी उभारणी आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे हजारो सभासद शेतकरी,कामगार यांच्या हितास बाधा निर्माण होत आहे.मात्र श्री गणेश संचालक मंडळ गणेश परिसरासाठी सर्वतोपरी लढत असल्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी स्पष्ट केले.


