
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदार संघात शुक्रवार (दि.२२) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अचानकपणे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडाले, झाडे कोसळली, फळबागांसह पिकांचे नुकसान झाले तसेच काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळे यांनी बाधित गावांना भेट देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व प्रशासनाकडून सुरू असलेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला.
शुक्रवार दि.२२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळे यांनी माहिती जाणून घेवून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.एवढ्यावरच न थांबता रविवार दि.२४ रोजी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी स्वत: मतदार संघातील नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. वादळामुळे अनेक घरांचे झालेले नुकसान, फळबागांसह, नर्सरी तसेच झाडे उन्मळून पडल्यामुळे जनावरांच्या गोठ्यांचे तसेच इतर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत नायब तहसीलदार सौ.प्रफुल्लिता सातपुते तसेच तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्याकडून नुकसान ग्रस्तांच्या पंचनाम्याबाबतची माहीती जाणून घेतली. मतदार संघातील ज्या गावात नुकसान झाले आहे त्या सर्व नुकसानीचे वेळत पंचनामे पूर्ण करून शासनाकडे त्वरित अहवाल सादर करा व पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त नागरीक मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी काळजी घ्या. यापूर्वीही नैसर्गिक संकटात महायुती शासनाकडे केलेल्या पाठ्पुराव्यातून नुकसानग्रस्तांना समाधानकारक नुकसानभरपाई मिळवून दिली आहे. त्याप्रमाणे याहीवेळेस झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे पाठपुरावा करून महायुती शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अशा कठीण प्रसंगी शासन व प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तुम्ही चिंता करू नका अशी ग्वाही देवून नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.


