
कोपरगाव प्रतिनिधी
पुणतांबा या पौराणिक महत्त्व असलेल्या गावाला दक्षिण काशी म्हणून ओळखतात. या तीर्थक्षेत्राचा “ब” दर्जा मिळून येणार आहे. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होळकर घाटाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामविकासच्या माध्यमातून पाच कोटी रुपये पर्यंत निधीही उपलब्ध करून देण्यास स्वतः प्रयत्न करणार आहे.यासाठी मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांचा सातत्याने पाठपुरावा असतो आणि आता आमदार विवेक कोल्हे यांचाही पाठपुरावा असणार आहे त्यामुळे अधिक प्रभावीपणे पुणतांबा तीर्थक्षेत्राचा विकास होईल असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
श्री क्षेत्र पुणतांबा या तीर्थक्षेत्र असलेल्या या गावाला राजा यज्ञसेनची नगरी म्हणून ओळखले जाते. कार्तिक स्वामी,बारा ज्योतिर्लिंग तसेच याज्ञसेनी देवी, मुदगलेश्वर, विठ्ठल मंदिर, शैव पंथीय समाधी, चांगदेव महाराज मंदिर परिसर तसेच या गावातील वेशी आणि इतरही जवळपास १७१ मंदिरांचे जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार यांनी पौराणिक महत्त्व असलेल्या पुणतांबा नगरीची अहिल्यादेवी यांनी बांधलेला होळकर घाट आणि या परिसरातील मंदिरांचा जतन संवर्धन आणि पुणतांबा परिसरातील घाट, मंदिरे इतरही विकास कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कार्तिक स्वामी मंदिरात दर्शन घेऊन तेथे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होळकर घाटाची पाहणी केली घाटाची झालेली दुरावस्था पाहून राम शिंदे यांनी याबाबत तातडीने संबंधित विभागाला सूचना देणार असल्याचे सांगितले.
स्नेहलताताई कोल्हे यांनी पुणतांबा तीर्थक्षेत्राचे महत्व विषद करून मंदिरे आणि पुरातन वास्तू यांचा जीर्णोध्दार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या केलेल्या विकासाच्या धर्तीवर व्हावा यासाठी मागणी केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार व कार्य हे नव्या पिढीला आदर्शवत ठेवा म्हणून जपण्यासाठी पुणतांबा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभापती प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या मागणीकडे विशेष लक्ष द्यावे असा आग्रह धरला.
यावेळी मंदिर दुरुस्ती सेवा समिति,बजरंगदल पुणतांबाचे सर्व स्वयंसेवक, गंगाधर चौधरी, मधुकर सातव,सुभाषराव वहाडणे,भारतराव वहाडणे,सुधाकर जाधव, चंद्रकांत वाटेकर, सुशांत घोडके,अनिल नळे,संभाजी गमे, अशोकभाऊ पवार ज्येष्ठ विश्लेषक माधव ओझा, शिरीष कुलकर्णी तसेच पदाधिकारी, नागरिक व सहकारी उपस्थित होते.
राजा यज्ञसेनची नगरी म्हणून कथेनुसार पुणतांबा ओळखले जाते.ब्रिटीश गॅझेट १८८७ मधील नोंदी नुसार अहिल्यादेवी होळकर यांनी इ. स. १७६५ ते १७९५ दरम्यान पुणतांबा येथे घाट बांधला. दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या या परिसरात बारा ज्योतिर्लिंग आहे – सुशांत घोडके
(गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ)


