
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदार संघात वीज ग्राहकांच्या समस्या वेळेवर सुटत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांसह छोटे-मोठे व्यवसायिक आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा फटका बसत असून याला जबाबदार महावितरणचे काही कामचुकार कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्यामुळे यापुढे वीज ग्राहकांच्या समस्यांचा तातडीने कशा सोडविता येतील याची काळजी घ्या आणि कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.२५) रोजी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्यापुढे आपल्या अडचणी मांडल्या त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शुक्रवार (दि.२२) रोजी झालेल्या वादळी वाऱ्याची कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघाला मोठी झळ बसली आहे. अनेक भागात झाडे वीज वाहिन्यांवर पडली असल्याने विजेचे खांब वाकले असून वीज वाहिन्या तुटल्या आहे. मात्र तीन दिवस उलटूनही तालुक्यातील काही गावांत तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्याचे आणि विजेचे खांब सरळ करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही हि कामे तातडीने पूर्ण करा. शेतकऱ्यांना शेती पंपासाठी सुरळीत वीज पुरवठा करा. डीपी बसवण्याचे व जोडण्याचे, नवीन वीज वाहिनी टाकण्याचे, एल टी लाईन जोडण्याचे काम आणि वीज वाहिन्यांच्या संपर्कात येणारी झाडे छाटण्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास मेन्टनसचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मजुरांची संख्या वाढवायला सांगा.चांदेकसारे येथे होणाऱ्या सबस्टेशनचे काम त्वरित सुरु करून शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी काम लवकर पूर्ण करा.
सोलर योजनेचा मतदार संघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी विशेष योजना राबवावी. गरज असल्यास नवीन सर्व्हे करून पात्र शेतकऱ्यांना फायदा करून द्या. सौर कृषी पंप योजनेच्या एजन्सीच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवा सोलर प्लांट योजनेच्या माध्यमातून जर शेतकऱ्याची फसवणूक झाली तर त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांना चुकीची माहिती देत असल्याचे निदर्शनास आले असून अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून वीज ग्राहकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील ११ गावातील सोलर प्लांटच्या कामांचा आढावा घेतांना सोलर प्लांटचे काम प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीला कोपरगाव ग्रामीण उपकार्यकारी अभियंता, राहाता ग्रामीण उप कार्यकारी अभियंता, तालुक्यातील विविध विभागीय अभियंता, विविध गावचे सरपंच आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


