

















न्यायाधीशपदी मुकुंद जावळे तर सहाय्यक नगररचनाकारपदी अक्षय आबनावे यांची निवड; ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण!!
जेऊर कुंभारी | वार्ताहर
जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने गावातील गुणवंत तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ आज दि. १७ मे २०२६ रोजी मारुती मंदिर, गिरमे वस्ती शाळा येथे उत्साहात पार पडला. गावातील युवकांनी मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समारंभात सोनेवाडी येथील मुकुंद रामदास जावळे यांची न्यायाधीश पदावर निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून न्यायव्यवस्थेत स्थान मिळवल्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून युवकांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच जेऊर कुंभारी येथील अक्षय नरेंद्र आबनावे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सहाय्यक नगररचनाकार, श्रेणी–१ या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला. कठोर परिश्रम, सातत्य आणि चिकाटीच्या बळावर मिळविलेल्या या यशामुळे गावातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना मुकुंद रामदास जावळे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही यश अशक्य नाही. आई-वडील, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या आशीर्वादामुळेच मला हे यश मिळाले. युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून मेहनत घ्यावी.”
तर अक्षय नरेंद्र आबनावे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “स्पर्धा परीक्षा म्हणजे संयम, अभ्यास आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी आहे. योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून त्यांनी आत्मविश्वासाने पुढे यावे.”
गावातील युवकांनी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात प्रगती साधावी, यासाठी अशा सत्कार समारंभातून प्रेरणा मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कार्यक्रमास गावातील
भिमराज वक्ते, दिपकराव गायकवाड, शिवाजी वक्ते
बाळासाहेब वक्ते, मधुकर वक्ते, विजय रोहम, दिलीपराव शिंदे,नितीन शिंदे ,जालिंदर चव्हाण, बापुराव वक्ते, धोंडीराम वक्ते, कल्याणराव गुरसळ,महेंद्र वक्ते, किरण पाटीलबा वक्ते,किशोर वक्ते,राजेंद्र गिरमे. रघुनाथ वक्ते,
किसन सोळके, दिगंबर वक्ते, भानुदास वक्ते,आनंदा रामभाऊ चव्हाण,कोंडीराम वक्ते, यशवंतराव आव्हाड, किशोर गायकवाड,
अरविंद जाधव, शंकर वक्ते, , कैलास चव्हाण,आनंदा चव्हाण, करणा वक्ते ,भाऊसाहेब जावळे, भिकाभाऊ चव्हाण, कर्णासाहेब वक्ते,शशिकांत गुरसळ, केशवराव चव्हाण,शशिकांत वक्ते, संदीप गायकवाड,
अमौल दौंड,संदीप राऊत, रामभाऊ आव्हाड, नरेंद्र अबनावे, गोकुळ जावळे, प्रदीप गायकवाड, प्रा.मधुकर वक्ते,राणा वक्ते आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च पदांवर निवड होऊन गावाचे नाव राज्यभर पोहोचवल्याबद्दल जेऊर कुंभारी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून हा सत्कार समारंभ गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला.


