Sunday, May 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedयंदा राजगिरा लाडू-चिक्कीलाही महागाईचा चटका; महिलांच्या रोजगारावरही परिणाम!!

यंदा राजगिरा लाडू-चिक्कीलाही महागाईचा चटका; महिलांच्या रोजगारावरही परिणाम!!

कोपरगाव प्रतिनिधी

उपवासासाठी सर्वसामान्यांचा आधार मानल्या जाणाऱ्या राजगिरा लाडू आणि चिक्कीवर यंदा महागाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे. गॅस टंचाई, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, डिझेलची कमतरता आणि पॅकिंग साहित्याच्या वाढलेल्या खर्चामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून त्याचा थेट फटका ग्राहकांसह महिला कामगारांनाही बसत आहे.
महाराष्ट्रातील नामांकित कंपनी म्हणून ओळख असलेल्या कालांश राजगिरा लाडू चिक्कीचे संस्थापक रोहित काळे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “पूर्वी आमच्या उद्योगात १०० ते १२५ महिलांना रोजगार मिळत होता. मात्र सध्या गॅस वेळेत उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावर मर्यादा येत असून आता फक्त १५ ते २० महिलाच काम करत आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, मालवाहतुकीसाठी डिझेलची उपलब्धता कमी झाली आहे. प्लास्टिक पॅकिंग साहित्याचे दर दुपटीने वाढले असून राजगिरा आणि गुळाच्या किंमतीतही जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी दहा रुपयांना मिळणारा राजगिरा लाडू आता पंधरा ते वीस रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
उत्पादनासाठी पर्याय म्हणून लाकडी किंवा डिझेल भट्ट्यांचा वापर करणेही कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “लाकडी भट्टीमुळे धूर आणि काजळी निर्माण होते, तर डिझेल भट्टीमुळे वास येतो. राजगिरा लाडू हा त्वरित वास शोषून घेणारा पदार्थ असल्याने गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या गॅसवरच अवलंबून राहावे लागत आहे,” असे रोहित काळे यांनी नमूद केले.
देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरकारने ऊर्जा संसाधनांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, तसेच पेट्रोल, डिझेल, गॅस आणि वीज यांसारख्या अत्यावश्यक गोष्टी सुरळीत व वेळेत उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. एकाच वेळी टंचाई निर्माण झाल्यास सामान्य जनता आणि लघुउद्योग दोघांनाही मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेल व्यवसायात आलेले तरुण, चहा विक्रेते तसेच गॅसवर आधारित छोटे उद्योग सुरू केलेल्या नवउद्योजकांना सरकारने दिलासा देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. अशा व्यवसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची अडचण समजून घेऊन प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुढील काही महिन्यांत आषाढी एकादशीसह विविध उपवासाचे दिवस येणार असल्याने राजगिरा लाडूची मागणी वाढण्याची शक्यता आहे. उपवासात सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांचा आधार असलेला हा पदार्थ महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!