
कोपरगाव प्रतिनिधी
पूर्वी सत्तेत नसताना देखील जनतेसाठी समस्या निवारण बैठका आणि परखड भूमिका घेतल्या मात्र आता विधानपरिषदेनंतर तालुक्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली असून दुप्पट वेगाने विकासकामे होतील, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम केल्यास सर्वसामान्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लागू शकतात,यासाठी प्रशासनाने अधिक वेगाने काम करण्याची क्षमता ठेवावी असे प्रतिपादन आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उद्घाटन प्रसंगी कोपरगाव शहरात कलश मंगल कार्यालय येथे केले.ते पुढे म्हणाले की, कोणतेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकारी वर्ग हा मोठा कणा असतो. कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वाद निकाली काढण्यात यश मिळवले आहे. दिव्यांग बांधवांचे आधार लिंकिंगचे व अद्ययावत कार्डचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे समाधान व्यक्त केले व अजूनही अनेक लोकाभिमुख कामे करायची आहेत असे मत मांडले.
या अभियानात सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घेतल्यास मोठ्या प्रमाणात जनतेचे प्रश्न सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी मोठा संघर्ष उभारला होता. कोकमठाण येथील खंडकरी शेतकरी लोहकने कुटुंबांचा प्रश्न प्रलंबित असून त्यातील विलंब दूर करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच शिंगणापूर जलजीवन मिशन योजनेचे काम नाहक विलंब केले गेले त्यामुळे नागरिकांना त्रास होतो याची जाणीव करून देत सदरचे प्रश्न जलद गतीने सोडवावे,वीज आणि पाणी व नागरिकांचे मूलभूत महसुली प्रश्न निकाली काढावे अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
प्रशासन हे जनतेच्या दारी जाऊन प्रश्न सोडवणारे असले पाहिजे हा विश्वास कोपरगाव शहर व तालुका परिषद करते आहे त्यांनी अधिक प्रमाणात काम करावे, असे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श पुढे ठेवला. वतनदारीऐवजी वेतनदारी पद्धती, जलव्यवस्थापन, सैन्यासाठी मदत योजना तसेच जमीन मोजणीसारखे दूरदृष्टीचे निर्णय शिवकाळात झाले, याचा उल्लेख करत आजच्या प्रशासनानेही त्यातून प्रेरणा घ्यावी, व नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून अधिक प्रभावी काम करावे असे त्यांनी सांगितले.
तहसील कार्यालयात सलग अठरा ते वीस सोमवार समस्या निवारण बैठका घेत नागरिकांच्या तक्रारींवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र सध्याच्या परिस्थितीत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची तब्बल ५४२ प्रकरणे केवळ बैठका न झाल्याने प्रलंबित राहिली असून नागरिकांचे लाखो रुपयांचे लाभाचे नुकसान झाले त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी सूचना त्यांनी केली.
सत्ता नसताना देखील आमच्या कार्यालयातून अनेक प्रकरणे दाखल झाली आणि त्यातून अनेक प्रश्न सुटले. सामाजिक कार्याच्या माध्यमातून आम्ही शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्याचे काम करत आहोत. मात्र प्रशासनानेही तत्परता आणि सहकार्य दाखवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.कधी कधी जनतेचे काम न झाल्यास अधिकाऱ्यांवर आम्ही रागावतो असे घडते, मात्र त्यामागे जनतेचे प्रश्न सुटावेत हीच तळमळ असते, असे सांगत लोकप्रतिनिधी म्हणून कुणाचेही काम अडू नये यासाठी आपण जबाबदारीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय यंत्रणेने सामोपचाराने काम करावे; मात्र जनतेची कामे अडली तर आम्हाला परखड भूमिका घ्यावी लागेल,असा इशाराही त्यांनी दिला.
अब काम का दौर आयेगा, जो बैठे थे खामोश उनको भी काम याद आयेगा..हा खुमासदार शेर सादर करताच सभागृहात व अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, डोमिसाईल प्रमाणपत्र, वारसनोंदी, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान, संजय गांधी निराधार योजनेचे दाखले, दिव्यांग प्रमाणपत्रे, ऑनलाइन हयातीचे दाखले तसेच विविध महसुली कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, कोपरगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, भूमी अभिलेख अधीक्षक रवींद्र खरोटे,निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, शेतकरी अभिजीत आव्हाड तसेच सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, माजी पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


