
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये धामोरी बाबासाहेब वाणी, अमोल वाणी, बापूसाहेब वाणी, ह.भ.प. नारायण महाराज लव्हाटे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज कदम, बाजीराव पेखळे, दिलीपराव लव्हाटे, संजय कदम, केतन लव्हाटे यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आ.आशुतोष काळे यांचा साधेपणा, विकासाची दूरदृष्टी, सामान्य जनतेशी असणारी नाळ आणि मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
पक्षातील नवीन सहकाऱ्यांचे स्वागत करतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, धामोरी गावातील ज्येष्ठ, तरुण आणि वारकरी संप्रदायातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा पक्ष असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विकासकामे, युवकांना संधी, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी पक्ष कटिबद्ध आहे. अगोदरच धामोरीसह पंचक्रोशीतील गावात मजबूत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत झाला आहे. नागरिकांचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव ध्यास घेवून सुरु असलेल्या विकासाच्या वाटचालीत मतदारसंघातील अनेक नागरिक सोबत जोडले जात आहे हि अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन धामोरी गावाचा आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनोज जगझाप, सुनील मांजरे, गणेश जाधव, शिवाजीराव वाघ, शिवाजीराव पेखळे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


