
कोपरगावातील महाराजस्व समाधान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!!
कोपरगाव प्रतिनिधी
गाव-खेड्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी मंडळ स्तरावर महायुती शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान हाती घेतले आहे. आज कागदपत्र जमा करून जर नंतर दाखले दिले जाणार असेल तर या शिबिराचा काही उपयोग होणार नाही. या शिबिराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जागेवरच मार्गी लागले पाहिजे तरच या अभियानाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होणार आहे. त्यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ कसा करून देता येईल याची काळजी घ्या आणि फक्त समाधान शिबिराच्या दिवशीच नाही तर वर्षभर प्रामाणिकपणे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहे.तहसील कार्यालयाच्या वतीने कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे शनिवार (दि.१६) रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले कि, महायुती शासन नागरिकांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवत आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून सर्वच योजना पात्र गरजू लाभार्थ्यांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. नागरीकांना वारंवार शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावू नका. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना देखील जलद सेवा द्या. गाव पातळीच्या अधिकाऱ्यांवर अधिक जबाबदाऱ्या असल्या तरी नागरिकांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.कोपरगाव तालुक्यात सर्वात जास्त बांधावरच्या रस्त्याचे प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल विभागाचे त्यांनी कौतुक केले. आणि यापुढे अधिक सक्रीय राहून या शिबिराच्या माध्यमातून बांधावरचे भांडण बांधावर कसे सोडवता येतील आणि शेत रस्त्यांचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील यासाठी प्रयत्न करा. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला तरच हे अभियान यशस्वी होणार आहे याचे भान ठेवा असे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ तसेच आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शिबीरस्थळी महिला बचत गटांनी उभारलेल्या विविध उत्पादनांच्या व व्यवसायाच्या स्टॉल्सना आमदार आशुतोष काळे यांनी भेट देत महिलांशी संवाद साधला.याप्रसंगी विधानपरिषद आमदार विवेक कोल्हे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,दिलीपराव बोरनारे, श्रावण आसने, शंकरराव चव्हाण, विष्णू शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, शैलेश साबळे, विजय त्रिभुवन, वाल्मिक लहिरे, सोमनाथ आढाव, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, फकीर कुरेशी, अजीज शेख, सचिन गवारे, सुनिल फंड, गणेश बोरुडे, चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे, संतोष शेलार, मुकुंद भूतडा, नितीन बोरुडे, आकाश डागा, जावेद शेख, सचिन परदेशी, राजेंद्र खैरनार, दादा पोटे, ठकाजी लासुरे, राजेंद्र आभाळे, प्रदीप कुऱ्हाडे, भाऊसाहेब भाबड, तन्मय साबळे, प्रकाश रुईकर, विशाल राऊत, बायजीत पठाण, बाळासाहेब शिंदे, रविंद्र राऊत, विनोद गलांडे, राजेंद्र तिरसे, सिद्धार्थ शेळके, हर्षल कृष्णानी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महायुती सरकारच्या माध्यमातून मागील सहा वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. या विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या मागील अनेक वर्षापासूनच्या अडचणी कायमच्या सुटल्या आहेत. त्यामुळे यापुढेही विकासकामे होणार आहेत त्या विकासकामांना कुठेही अडथळा आणू नका.


