
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता निळवंडे पाटपण्यामधून तालुक्यातील सर्व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भात वेस सोयगाव, अंजनापूर, बहदराबाद, बहादरपूर, मनेगाव, डांगेवाडी आदी गावांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार कोल्हे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात निळवंडे धरणातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून परिसरातील सर्व पाझर तलाव भरल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल, विहिरींना पाणी उपलब्ध राहील तसेच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल, असे नमूद करण्यात आले. उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. हापसे साहेब यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला.
नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा त्रास होऊ नये यासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पंचक्रोशीतील सर्व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही त्वरीत सुरू करण्याचे निर्देशही दिले.
यावर कार्यकारी अभियंता श्री. हापसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मागणीवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी नानासाहेब गव्हाणे, भीमराव गुंजाळ, बाबासाहेब नेहे, रामदास भडांगे, राजेंद्र कोल्हे, बाळासाहेब काकडे, नितीन पाचोरे, सुरेश पाडेकर, कैलास रहाणे आदी उपस्थित होते.
धोंडेवाडी व जवळके येथील पाझर तलाव भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाणी तलावात भर सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना केली.


