कोपरगाव प्रतिनिधी
नगर-मनमाड महामार्गाच्या आणि त्याअंतर्गत सावळी विहीर ते पुणतांबा फाटा ते येवला नाका या रस्त्याचे दुरुस्तीचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी आंदोलन करणाऱ्या स्नेहलताताई कोल्हे यांना ‘तुमची वेळ चुकली’, असे तुम्ही म्हणता; पण त्यात काहीच तथ्य नाही. मागील तीन वर्षे राज्यात तुमच्या पक्षाची सत्ता असतानाही तुम्ही नगर-मनमाड महामार्गाचे काम तर सोडाच, त्यावरील साधे खड्डे बुजविण्याचे कामसुद्धा करू शकला नाही. तसेच तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्नही तुम्ही सोडवू शकला नाही. तुमच्या खोटारडेपणाला जनता पुरती कंटाळली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांना मतदान करून आपण चुकलो तर नाही ना, अशी भावना कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. अशोकराव काळे आमदार असताना कोपरगाव शहरातील व तालुक्यातील जनतेला पुणतांबा-श्रीरामपूर-देवळाली प्रवरा-राहुरीमार्गे अहमदनगरला जावे लागायचे. याचा तुम्हाला विसर पडला आहे का? त्याच काळात नगर-मनमाड महामार्गाची अवस्था आजच्यापेक्षाही वाईट होती. स्नेहलताताई कोल्हे आमदार झाल्यानंतर त्यांनी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सावळी विहीर ते कोपरगाव रस्ता चांगला करून घेतला होता. गोदावरी नदीवरील नवीन मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करून घेतली. आताही या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत स्नेहलताताई कोल्हे पाठपुरावा करणार आहेत. खड्ड्यांचा इतिहास तुमचा आहे, कोल्हे यांचा नाही, हे तुम्ही विसरू नये, असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.


