कोपरगाव प्रतिनिधी
पाणी, सिंचन, रस्ते, आरोग्य, शहरातील वाढीव घरपट्टीचा प्रश्न व इतर लहान-मोठे प्रश्न असो, जनहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे परिवार कायमच सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या अत्यंत संकटाच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडून आ. आशुतोष काळे हे अम्पल-चम्पल खेळण्यात मग्न होते. गेली तीन वर्षे आ. काळे हे आपण काम करीत असल्याचा आभास निर्माण करून जनतेची दिशाभूल करत आहेत. खरे नौटंकीबाज कोण हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असा सणसणीत टोला माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विद्याताई सोनवणे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहर आणि तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबरच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री लोकनेते स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार आणि भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी आजपर्यंत काय-काय काम केलेले आहे, कोपरगाव तालुक्याच्या प्रगतीमध्ये कोल्हे परिवाराचे किती मोलाचे योगदान आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. याउलट आ. आशुतोष काळे आणि त्यांच्या परिवाराने तालुक्याच्या विकासात सतत खोडा घालण्याचाच प्रयत्न केलेला आहे. सदैव जनतेसाठी कार्य करणाऱ्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठविण्याचा धडाका लावला आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात कोल्हे यांना यश मिळत असल्यामुळे आ. आशुतोष काळे व त्यांचे समर्थक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून, त्यामुळे नैराश्यातून ते कोल्हे यांच्यावर खोटे आरोप व बिनबुडाची टीका करत आहेत. कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व मालमत्ता करवाढीच्या विरोधात भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच साखळी उपोषण केले. या साखळी उपोषणाला नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला.तुमच्या खोटारडेपणाला जनता पुरती कंटाळली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांना मतदान करून आपण चुकलो तर नाही ना, अशी भावना कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. अशोकराव काळे आमदार असताना कोपरगाव शहरातील व तालुक्यातील जनतेला पुणतांबा-श्रीरामपूर-देवळाली प्रवरा-राहुरीमार्गे अहमदनगरला जावे लागायचे. याचा तुम्हाला विसर पडला आहे का? त्याच काळात नगर-मनमाड महामार्गाची अवस्था आजच्यापेक्षाही वाईट होती. स्नेहलताताई कोल्हे आमदार झाल्यानंतर त्यांनी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सावळी विहीर ते कोपरगाव रस्ता चांगला करून घेतला होता. गोदावरी नदीवरील नवीन मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करून घेतली. आताही या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत स्नेहलताताई कोल्हे पाठपुरावा करणार आहेत. खड्ड्यांचा इतिहास तुमचा आहे, कोल्हे यांचा नाही, हे तुम्ही विसरू नये, असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.


