

कोपरगाव प्रतिनिधी
“प्रक्रिया उद्योग उभारणी ” या विषयावर डाऊच खुर्द येथील सखी महिला कृषी गट यांच्या उपक्रमातून शेती पूरक उद्योग व्यवसाय या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र बाभळे श्वर येथील प्रमुख शास्त्रज्ञ श्री भारत दवंगे व सौ अनुराधा वांढेकर हे उपस्थित होते.
डाऊच खुर्द येथे गेल्या तीन वर्षापासून कृषी विभागाच्या वतीने श्रीमती निर्मला सोनवणे यांनी सखी महिला गट स्थापन करून वेळोवेळी शेती विषयावर तसेच व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन केले आहे.त्यावर या शेतकरी महिला सेंद्रिय शेती,गांडूळ खत बनविणे,रोपे तयार करणे,या प्रकारची कामे करत आहेत.शेतकरी महिला घरचे काम सांभाळून एखादा घरगुती उद्योग व्यवसाय सुरू करावा यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यातआले होते.
महिलांनी शेतीशी निगडीत असलेल्या अनेक उद्योग व्यवसाय उभारणीसाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत तसेच ,कोणकोणत्या उद्योगांना कशा प्रकारे अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकते याबाबत सौ.अनुराधा वांढेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
भारत दवांगे यांनी सोयाबीन पिक व कांदा पिकावर येणाऱ्या संभाव्य रोग व किडी बाबत चर्चा करून घ्यावयाची काळजी तसेच आपल्या भागामधील सुरू असलेले प्रक्रिया उद्योग कशा प्रकारे सुरू आहेत, व त्यातून आपण प्रोत्साहन घेऊन त्यावर काम करू शकतो याबाबत चर्चात्मक सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डाऊच खुर्द येथील सरपंच संजय गुरसळ उपस्थित होते.गोदावरी वाहतूक संघ कोळपेवाडी सहकारी साखर कारखाना चे एम. डी. दिलीप शिंदे , मंडळ कृषी अधिकारी श्रीमती
माधुरी गावडे,कृषी पर्यवेक्षक संजय घनकुटे,कृषी अधिकारी श्रीमती निर्मला सोनवणे हे उपस्थित होते.ग्रामपंचायत सदस्य शंकर गुरसळ, सखी महिला गटाच्या अध्यक्षा हिराबाई गुरसळ, सचिव सौ. मंगल गुरसळ व सखी महिला कृषी गटाच्या सर्व सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.जेऊर कुंभारी येथील सायोंगिता कृषी महिला गटाच्या महिला ही यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता शिंदे यांनी केले व प्राजक्ता गुरसळ यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.


