
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरात सत्याग्रही कोपरगाव यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शहर अधिक हरित व्हावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते झाले. यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य सभापती वैभव आढाव, मुख्याधिकारी अजित निकत तसेच स्वच्छतादूत व वृक्षमित्र सुशांत घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गीता प्रशाला (नायडूबाई यांची शाळा) येथे विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष विजयजी बंब, बाळासाहेब पांढरे, रामदास खैरे, सुभाष भास्कर, संभाजी नाईक, अशोक नायडू, शरदनाना थोरात,राजेंद्र बागुल, कादरभाई शेख, पुरुषोत्तम पगारे सर, वसंतराव शेळके, किशोर भांगे, बाळासाहेब खंडागळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


