
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी व परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला असून, खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन व मका पेरणीची कामे पूर्ण केली असून, कापूस लागवडही अंतिम टप्प्यातून पूर्ण झाली आहे. पेरणीनंतर आवश्यक असलेल्या ओलाव्याअभावी शेतकरी चिंतेत होते. मात्र, रात्रीपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून, पिकांच्या उगवणीस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसून येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामाकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. वेळेवर झालेल्या या पावसामुळे पिकांची उगवण चांगली होईल, तसेच उत्पादनात वाढ होण्याची आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
शेतकरी कल्याण गुरसळ यांनी सांगितले की, “सोयाबीन, मका पेरण्या आणि कापूस लागवड पूर्ण झाल्यानंतर पावसाची अत्यंत गरज होती. रात्रीपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांच्या उगवणीला चांगला फायदा होणार आहे. आता पुढेही नियमित पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कृषी क्षेत्राशी संबंधित जाणकारांच्या मते, पेरणीनंतर वेळेवर झालेला पाऊस पिकांच्या प्रारंभिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे जेऊर कुंभारी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून, आगामी काळातही पावसाची साथ कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, शेतकरी आता जोमाने पुढील शेतीकामांच्या तयारीला लागले आहेत.


