
कोपरगाव प्रतिनिधी
ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही, जसा माऊली बाळा
या प्र.के. अत्रेंच्या कवितेने विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील प्रेम, स्नेह, जिव्हाळ्याचा संबंध अधोरेखित केला आहे. मात्र बालमनाला शाळा आवडण्यासाठी शाळाही तशीच हवी तेव्हा बालके तिच्याकडे आकर्षित होतील किंवा त्यांना गोडवा निर्माण होईल. कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथील गिरमे वस्ती येथे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. मात्र या शाळेची दुरवस्था झाली होती. भिंतींचे रंग उडाले होते. या शाळेत सुदाम साळुंके व प्रतिभा साळुंके हे शिक्षक दाम्पत्य बदली होऊन आले. त्यांनी शाळेची दुरावस्था बघितली आणि त्यांचे मन सुन्न झाले. या शाळेसाठी काहीतरी करावे म्हणून त्यांनी झपाटल्यागत शाळा विकासास सुरवात केली. यात त्यांचा मुलगा उमेश व मुलगी प्रियंका हेही सहभागी झाले. त्यांनी स्वतः पदरमोड करीत इयत्ता तिसरीच्या वर्गाला रंग देणे, डिजिटल तक्ते, भिंतींना आखीव रेखीवपणा बसवणे, नकाशे, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे, मुळाक्षरे, व्यंजने यांचे मोठे कागदी तक्ते लावून शाळेची शोभा वाढवली. श्रमदानातून शाळा परिसर स्वच्छ केला. शाळेतील वातावरण प्रसन्न असेल तर विद्यार्थ्यांचे मन शाळेमध्ये रमत असते. जेऊर कुंभारी गावात तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच जागृत असतात. कोरोना महामारीच्या काळामध्ये या तिन्ही शाळेतील शिक्षकांनी वाड्यावर जाऊन अध्यापनाचे कामकाज केले. त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आज स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने जेऊर कुंभारी गावचे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी सुदाम साळुंके व त्यांच्या परिवाराचा विशेष गुणगौरव केला.


