
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील किसान काँग्रेसच्या वतीने महसूल,वीज,पाठबंधारे तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विजय बोरुडे यांना सोमवार दि १४ फेब्रुवारी रोजी मागण्याचे निवेदन दिले आहे.
याप्रसंगी कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंखे, विजय जाधव, ज्ञानेश्वर भगत, अँड शितल देशमुख, महादेव जगताप, चंद्रकांत बागुल ,चंद्रहार जगताप, बाळासाहेब शिंदे आदींसह तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे किसान काँग्रेसने शासनास मागणी केली आहे की शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या खंडित केलेल्या वीज पुरवठा तत्काळ नियमित करणे, नादुरुस्त रोहित्राची महावितरण कंपनीनेच मोफत दुरुस्ती करून देत शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, तालुक्यातील दोन्ही कालव्याचे आवर्तन सुरळीतपणे सुरू करावे तसेच तालुक्यातील ७० वर्षांपासून शासन दरबारी अस्तित्वात असलेल्या मात्र प्रत्यक्षात नामशेष झालेल्या शिवरस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा अशा आशयाचे निवेदन किसान काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना दिले आहे.


