Thursday, April 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय अस्मितेसाठी सेवायोजन शिबीरे महत्वाची!!-विवेक कोल्हे.

राष्ट्रीय अस्मितेसाठी सेवायोजन शिबीरे महत्वाची!!-विवेक कोल्हे.

कोपरगाव प्रतिनिधी

             राष्ट्रीय अस्मितेची भावना जागृत होण्यासाठी राष्ट्रीय सेवायोजन शिबीरे महत्वाची असतात असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात आले त्याचा समारोप रविवारी करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त बाहेर पडल्यानंतर काय करावे लागते याचे प्राथमिक शिक्षण राष्ट्रीय सेवायोजन शिबिरातून मिळते असेही ते म्हणाले. प्रारंभी सरपंच साधना देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी प्रास्ताविकात श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश सांगितला. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे यांनी गावच्या विकासाची माहिती दिली.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय जडणघडणीत महाविद्यालयीन काळात केलेल्या श्रमसंस्काराचा मोठा वाटा आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत तरुणांमध्ये सामाजिक संस्काराची शिदोरी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
 दहेगावला मोठा देशभक्तीचा वारसा लाभला आहे.आपल्या सर्वांचे अभिमान शहीद सुनील वलटे यांची हजारो तरुणांना प्रेरणा मिळते.त्यांच्यासारखे वीरच आपल्या देशाचे हिरो असून त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवत आपण कार्य करणे व दैनंदिन जीवनात देशहिताचे काम करणे हा श्रमसंस्कार शिबिराचा मूळ उद्देश आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची भावना गोरगरीब कुटूंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये ही होती.त्यांनी आयुष्यभर यासाठी काम केले.अशा आदर्श संस्थेत आपण विद्यार्थी आहात त्याचा फायदा आपली जडणघडण होण्यासाठी करणे आवश्यक आहे. सामान्य कुटूंबातील विद्यार्थी कसा पुढे जातो याचे उदाहरण म्हणजे माजी मंत्री श्री.शंकरराव कोल्हे होय. ते सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी होते. त्यांनी अमेरितून शिक्षण घेऊन स्वित्झर्लंडला घड्याळाचा कारखाना टाकला होता,मात्र त्यानंतर वडिलांनी सांगितले की परदेशात तुम्हाला स्थायिक होण्यासाठी पाठवले नाही तर आपल्या शिक्षणाचा आपल्या भागाला फायदा व्हावा यासाठी काम करावे.त्यानंतर ते परत आले व त्यांनी गावपातळी पासून राजकीय सामाजिक जीवनात प्रश्न सोडवण्यासाठी सुरवात केली. सरपंच,पंचायत समिती सभापती, आमदार, मंत्री,शिक्षणसंस्था,कारखाना यातून परिसराचा कायापालट केला व आजही ९४ वर्षे वय असतांना ते सर्व संस्थांना भेटी देतात.यावरून ही गोष्ट निदर्शनास येते की आपण सामान्य कुटूंबातून असलो तरीही शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आपल्या भागाला,परिसराला व देशाला करून देण्यासाठी कार्य करता येते फक्त त्यासाठी मेहनत व जिद्द आवश्यक आहे.पर्यावरण,आरोग्य,स्वच्छता,सामाजिक ऐक्य यासह सर्वच सामाजिक भावना व कार्य जोपासणे हा हेतू राष्ट्रीय सेवा योजनेतून जपला जातो.दहेगाव हे तालुक्यातील एक आदर्श गाव आहे.विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी आपल्या जीवनात घेतांना आपल्या देशासाठी आपण रोज काही ना काही योगदान द्यावे हे विचारात घेऊन कार्य करत रहावे असे विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.
याप्रसंगी सर्वश्री. रवींद्र देशमुख, निलेश सरोदे, संतोष देशमुख, गणेश जाधव, डॉ.गुलाबराव वरकड, बाबासाहेब आभाळे, ग्रामसेवक आर.पी. सय्यद, डॉ.रणधीर ,डॉ.महाले,डॉ.वाघमोडे, दिघे सर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी कोल्हे कारखान्याचे माजी संचालक डॉ. गुलाबराव वरकड यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!