
कोपरगाव प्रतिनिधी
आज प्रत्येक क्षेत्रात प्रतिकुल परिस्थीतीशी लढा देवुन पोलीस दलात विशेषत: नक्षली भागात जाऊन काम करत शौर्य गाजवणं आव्हानात्मक असून त्यात कोपरगांव शहराचे पोलीस उपनिरीक्षक भरत चिंतामणी नागरे यांनी केलेली कामगिरी राष्ट्रपती शौर्य पुरस्कारापर्यंत पोहोचली ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनी कोपरगांव तहसिल कार्यालय मैदानावर पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्यावतीने सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भाजपा गटनेते रविंद्र पाठक यांनी प्रास्ताविक केले. श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस दलाची ख्याती सर्वत्र आहे. त्यांच्या धाडसाच्या यशोगाथा आपण नेहमीच ऐकत असतो. २०१८ साली नक्षली भागात इटापल्ली तालुक्यातील मेंढरी येथे त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी नलवायांनी स्फोटके, बॉम्ब पेरून हल्ला केला होता पण प्रत्युत्तरादाखल त्यांनी एका नक्षलवाद्यास यमसदनी धाडले आणि हीच कामगिरी त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन गेली; त्यांच्या हातून आणखी देशसेवा घडो व त्यांच्या कुटुंबियांना आपणा सर्वांचे पाठबळ मिळत राहो हीच त्यांच्या सत्कार्यiची यशोगाथा म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या कामगिरीमुळे आपणा सर्वांची मान उंचावली आहे असेही ते म्हणाले.या प्रसंगी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवाजीराव खांडेकर, कैलास खैरे, नगरसेवक जनार्दन कदम, वैभव गिरमे, फकीरमहंमद पहिलवान यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी आभार मानले.


