
शिर्डी येथे साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराची सांगता!!
कोपरगाव प्रतिनिधी
पूर्वीच्या तुलनेत आज साखर कारखानदारीमध्ये मोठा बदल झाला असून अनेक कारखाने आता स्वयंचलित झाले आहेत. तंत्रज्ञान आधुनिक यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांमुळे कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. या बदलत्या काळात भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि कारखान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी साखर कामगारांनी काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून आधुनिक प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले की, साखर उद्योग हा ग्रामीण महाराष्ट्राचा मुख्य आर्थिक कणा आहे. हा उद्योग केवळ साखर निर्मितीपुरता मर्यादित नसून यावर हजारो कामगारांच्या संसार प्रपंच अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव आणि कामगारांच्या श्रमाला योग्य मोबदला देऊन त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम या उद्योगातून होते. शेतकरी आणि कामगार हे या साखर उद्योग रथाची दोन महत्त्वाची चाके आहेत. यातील एकाही चाकात बिघाड झाला तर हा उद्योगरूपी रथ पुढे चालू शकत नाही. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मोठी मदत होत आहे.
कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी सरकार, कामगार आणि शेतकरी यांची देणी कोणत्याही परिस्थितीत थकीत ठेवायची नाहीत हा कानमंत्र दिला आहे. त्या मूलमंत्रावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर आहे.
कामगार घेत असलेल्या परिश्रमाचा त्यांना योग्य मोबदला देणे ही कारखान्याची पहिली जबाबदारी आहे. कामगार हा शेतकरी आणि साखर उत्पादक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कामगारांच्या अडचणी व्यवस्थापन मंडळाने वेळेवर समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत.
कारखान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांना जास्तीचा मोबदला देण्यासाठी आणि आपल्या कामगारांच्या वेतनात वाढवण्यासाठी भविष्यात होणारे तांत्रिक बदल कामगारांनी आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन सर्वांनी या उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले.
चौकट – कृषी, सहकार आणि साखर उद्योगाची अजितदादांना सखोल जाण होती. साखर कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर त्रिपक्षीय समितीला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्याचे महत्त्वपूर्ण काम अजितदादांनी केले होते. त्यामुळे अशा प्रसंगी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे आवर्जून सांगितले.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, छत्रपती सहकारी साखर कारखाना, इंदापूरचे व्हा. चेअरमन शिवाजीराव निंबाळकर, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस रावसाहेबजी पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय निमसे, अशोकराव पवार आदींसह महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे पदाधिकारी, राज्यभरातील साखर कामगार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


