
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील टाकळी, जेऊर कुंभारी, चांदेकसारे, कोकमठाण यांसह ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असलेले भारनियमन तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी केली आहे.
सध्या गावोगावी गणपती बाप्पा विराजमान झाले असून गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना ऐन सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. गणपती बाप्पा विराजमान असताना ग्रामीण भागात सायंकाळचे भारनियमन का? असा सवालही देवकर यांनी उपस्थित केला आहे.
त्यातच ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सायंकाळी अंधार पडल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच गणेशोत्सवासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सायंकाळचे भारनियमन बंद करणे आवश्यक असल्याचे देवकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महावितरणने ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षितता तसेच गणेशोत्सवाचे वातावरण लक्षात घेऊन सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंतचे भारनियमन तातडीने बंद करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील भारनियमन त्वरित बंद न केल्यास नागरिकांना सोबत घेऊन महावितरणच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी सभापती सुनील देवकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.


