
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गणेशोत्सवासह आगामी काळात वीज भारनियमन बंद ठेवून नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या नाशिक झोनच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले आहे.आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा व मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सार्वजनिक उत्सव आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच गणेश मंडप, सार्वजनिक रोषणाई, मिरवणुका व विविध कार्यक्रमांसाठी सातत्यपूर्ण वीजपुरवठा आवश्यक असतो.
गणेशोत्सवाच्या कालावधीत वीज भारनियमन झाल्यास सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यक्रम, रोषणाई तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बिबट या वन्यप्राण्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याच काळात भारनियमन होत असल्याने रात्रीच्या वेळेला शेतकरी बांधवांना जीवितहानीचा धोका निर्माण झालेला आहे. दररोज बिबट प्राण्याचा रात्रीच्या वेळेस वावर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस होणारे भारनियमन शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय बनला आहे.तसेच ऐन सायंकाळच्या वेळेला भारनियमन होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे गृहिणी महिलांच्या दैनंदिन स्वयंपाक व इतर घरगुती कामांकरिता मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करून सायंकाळच्या वेळेसही वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गणेशोत्सव काळासह आगामी काळात वीज भारनियमन बंद ठेवून नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी महावितरणच्या नाशिक झोनच्या मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


