
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड व एनसीसीएफमार्फत हमीभावाने कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह एन सी सी एफ व नाफेडकडे केली होती त्यास सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत हमीभावाने कांदा खरेदीस मान्यता दिली असून याबद्दल आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
महाराष्ट्र राज्यात कांद्याच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा कमी दर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला होता. या पार्श्वभूमीवर आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे नाफेड व एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिल्यानंतर हमीभावाने कांदा खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होणार आहे.
नाफेड व एनसीसीएफकडून बाजार समिती आवारातील खरेदीसाठीचे बाजार शुल्क माफ होणार असून सरकारी कांदा खरेदीसाठी असलेल्या जाचक अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.त्यामुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.


