Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedहरिसन ब्रँचच्या चारीला पाणी का नाही? आमदार गप्प का?

हरिसन ब्रँचच्या चारीला पाणी का नाही? आमदार गप्प का?

पाऊस गायब, पाटपाणीही नाही; उभी पिके करपली — सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी!!- उपसरपंच यशवंतराव आव्हाड

जेऊर कुंभारी वार्ताहर

कोपरगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना हरिसन ब्रँचच्या चारीला अद्याप पाटपाणी मिळत नसल्याने उभी पिके करपून चालली आहेत. जेऊर कुंभारी, डाऊच, चांदेकसारे आणि कोकमठाण परिसरातील हरिसन ब्रँच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पाऊस नाही आणि पाटपाणीही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
याबाबत जेऊर कुंभारीचे उपसरपंच यशवंतराव आव्हाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन व पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच मोठा खर्च करून खरीप पिके उभी केली आहेत. मात्र पावसाने पाठ फिरविल्यानंतर पिकांना आधार देणारे पाटपाणीही वेळेत मिळाले नाही. आता उशिराने आवर्तन सोडले तरी करपलेल्या पिकांना त्याचा कितपत फायदा होणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
आव्हाड यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “हरिसन ब्रँचच्या चारीला वेळेत पाणी मिळाले नाही. पावसानेही दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके जळून चालली आहेत. आता उशिराने आवर्तन सोडून उपयोग होणार नाही. शासनाने या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी.”
तसेच ‘कॅलिफोर्निया’चा भाग वाळवंटी होण्याच्या मार्गावर आहे
मुबलक पाणी आणि सुपीक जमिनीमुळे पूर्वी या परिसराला ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखले जात होते. मात्र आज पाण्याच्या नियोजनाअभावी हाच भाग वाळवंटी होण्याच्या मार्गावर असल्याची खंत आव्हाड यांनी व्यक्त केली. “या परिस्थितीला जबाबदार कोण?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शेतीच्या मशागतीपासून बियाणे, खते, औषधे आणि मजुरीपर्यंत मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली आहेत. मात्र पाऊस नसताना पाटपाणीही वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
अल्पसंख्याक लाभार्थी असल्यामुळे अन्याय होतोय का?
हरिसन ब्रँचच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अल्पसंख्याक असल्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा गंभीर सवाल उपसरपंच यशवंतराव आव्हाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून उपस्थित केला आहे. पाणीवाटपात संख्याबळाचा विचार न करता प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला समान न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्याचे आमदार या गंभीर प्रश्नात कधी हस्तक्षेप करणार? हरिसन ब्रँचच्या चारीला पाणी कधी सोडणार? असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.
हरिसन ब्रँच लाभक्षेत्राची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि पाणीवाटपाचे योग्य नियोजन करून या भागाला न्याय द्यावा, अशी मागणी उपसरपंच यशवंतराव आव्हाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!