

जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर रविवारी दि. १३ सप्टेंबर सायंकाळी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. कोकमठाण येथील राहुल भास्कर थोरात यांच्या सर्वे नं. ३७७/१० मधील क्षेत्रात सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास शिकारच्या शोधात फिरत असताना बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
गेल्या काही दिवसांपासून जेऊर कुंभारी, कोकमठाण व परिसरातील शेतवस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे, जनावरे बांधण्यासाठी गोठ्यात जाणे तसेच शेतातील कामे करणे याबाबत शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण होते. बिबट्याच्या हालचाली वारंवार निदर्शनास येत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी राहुल थोरात यांच्या घरासमोर पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्याला पिंजऱ्यात आकर्षित करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. अखेर रविवारी सायंकाळी बिबट्या शिकारच्या शोधात फिरत असताना पिंजऱ्यात शिरला आणि जेरबंद झाला.
बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षितपणे अडकल्याचे पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. बिबट्या जेरबंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या छायेत असलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी जेऊर कुंभारी गावचे सरपंच यशवंतराव आव्हाड,
संदीप लोंढे, किशोर माळवे, आनंद बिडवे, लखन बिडवे ,रवी चव्हाण, माधव चाळक, भिकन ठाकरे, विजय थोरात, शाम थोरात, जगुण्णा थोरात, कैलास रक्ताटे, वसंत त्रिभवन, सुनील बढे, यांच्यासह कोकमठाण व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


