
जेऊर कुंभारी वार्ताहर
तब्बल २६ वर्षांनंतर डी.एड. महाविद्यालयातील वर्गमित्र पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा अविस्मरणीय सोहळा साजरा केला. आळेफाटा जवळील माळशेज घाट परिसरातील गौरीनंदन हॉटेलमध्ये आयोजित या स्नेहमेळाव्यात मित्र-मैत्रिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येक मित्र-मैत्रिणीला मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी गेल्या २६ वर्षांतील जीवनप्रवास, कुटुंब, मुलांचे शिक्षण, व्यवसाय तसेच डी.एड.च्या विद्यार्थी जीवनातील गमती-जमती आणि अविस्मरणीय प्रसंगांना उजाळा दिला. जुन्या आठवणी सांगताना काही मित्र भावूक झाले, तर काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
डी.एड.च्या वर्गात एकत्र शिकलेले मित्र पुढे नोकरी, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांत स्थिरावले. काळाच्या ओघात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या; मात्र मनातील आपलेपणा आणि मैत्रीची नाळ कायम राहिली. तब्बल २६ वर्षांनंतर झालेल्या या भेटीत पुन्हा एकदा महाविद्यालयीन दिवस जिवंत झाल्याचा अनुभव सर्वांनी घेतला.
“व्यावसायिक जीवनात प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात पुढे गेला; मात्र मैत्रीची भावनिक वीण आजही तितकीच घट्ट आहे. ही मैत्री पुढील पिढ्यांसाठीही जपली पाहिजे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यापुढे २६ वर्षांचा विराम न ठेवता दरवर्षी अशाच प्रकारे स्नेहमेळावा आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला. “मैत्रीला २६ वर्षांचा विराम होता; पण मनातील आपलेपणा कालही तसाच होता आणि आजही तसाच आहे,” या भावनेने स्नेहमेळाव्याला विशेष भावनिक उंची मिळाली.
यानंतर सर्वांनी माळशेज घाटातील निसर्गरम्य परिसर आणि धबधब्यांचा मनमुराद आनंद घेतला. दिवसाच्या अखेरीस कॉफीचा आस्वाद घेताना एस.पी. घोडके सर आणि बथुवेल हिवाळे सर यांनी ‘चलते चलते’ आणि ‘बने चाहे दुश्मन’ या गीतांचे सुमधुर गायन केले. यामुळे जुन्या आठवणींना आणखी उजाळा मिळाला.
हास्याचे फवारे, जुन्या आठवणी, भावूक करणारे क्षण आणि पुन्हा भेटण्याचा संकल्प अशा आनंददायी वातावरणात २६ वर्षांनंतरचा हा स्नेहमेळावा सर्वांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणारा ठरला.यावेळी
विजय कुऱ्हाडे, आबासाहेब ठाणगे, शरद शेळके, डॉ. संतोष दिवे, नवीन वागजकर, रामदास गव्हाणे, ज्ञानेश्वर सैंदाणे, निवृत्ती कचरे, भागवत पोखरकर, बथुवेल हिवाळे, संतोष घोडके, मोहिनी लाळगे, जयश्री चेमटे, मनीषा पारखे, मोहिनी दिवटे, आशा पवार, जयप्रकाश राशिनकर, चंद्रकांत पांढरे, संतोष भारती, रमेश बोडखे, जगन्नाथ राऊत आदी उपस्थित होते.


