Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्मवीर शंकरराव काळे कारखाना २०२५-२६ च्या गळीतास आलेल्या ऊसाला ३३०० रुपये दर...

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना २०२५-२६ च्या गळीतास आलेल्या ऊसाला ३३०० रुपये दर देणार!!-आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

इतर जिल्ह्यातील काही कारखान्यांच्या ऊसदराची चर्चा सध्या होताना दिसत असली तरी वास्तविकता समजुन घेणे आवश्यक आहे.त्यामुळे त्या जिल्ह्यातील कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देण्याची आपली पण तयारी आहे त्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातुन किमान ९ ते १० लाख मे.टन ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. तरी देखील नेहमीप्रमाणे ऊस दरात मागे न राहता २०२५-२६ च्या हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना अनुदानासह रुपये ३३००/- व ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या ऊसास रु.१००/-प्र.मे.टन अनुदान देवून रुपये ३४००/- दर देणार अशी जाहीर घोषणा आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली असून जिल्ह्यात ऊस दरात आघाडीची आपली परंपरा कायम ठेवली आहे.शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक कारभार, आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या बळावर सहकारी साखर कारखानदारीत प्रगतीचा नवा मापदंड निर्माण करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ७३ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली.या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना ज्ञानदेव मांजरे यांनी मांडली सदर सूचनेस केशवराव जावळे यांनी अनुमोदन दिले.कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित हेच आपल्या कारखान्याच्या प्रत्येक निर्णयाचे केंद्रबिंदू राहिले आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण ठेवत, त्यांच्या ऊसाला योग्य दर, वेळेवर ऊसाचे पेमेंट आणि पारदर्शक कारभाराची भक्कम परंपरा निर्माण केली. ती परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांनी जपली ही केवळ परंपरा नाही, तर शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि विश्वासाचे नाते आहे. साखरेचे दर वाढल्यावर जास्तीचा ऊस दर मिळावा अशी अपेक्षा असणे अजिबात गैर नाही परंतु देशांतर्गत बाजारामध्ये जुलैच्या शेवटच्या पंधरवाड्यापासुन थोड्या प्रमाणात साखरेची दरवाढ झाली परंतु ऑगस्टच्या तिस-या आठवड्यात एकाएकी साखर दरात झालेली वाढ नैसर्गिक नव्हती. साठेबाजीच्या माध्यमातुन साखरेचा साठा करुन कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली. त्यामुळे साखर कारखान्यांना साखर दरवाढीचा फार मोठा फायदा झाला असे चित्र निर्माण करण्यात आले असले तरी साखर कारखान्यांनी उत्पादीत केलेली ८० ते ८५% साखर त्यापुर्वीच बाजारात विक्री झालेली होती. साखर दरवाढ नियंत्रणाकरीता केंद्र शासनाने तातडीने पाऊल उचलत केलेल्या उपाय योजनांमुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात परत साखरेच्या दरात मोठी घसरण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रु.३.८१ कोटी झालेला असून संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक कामकाजास लेखापरिक्षकांनी ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताची भूमिका घेतलेली आहे.त्यामुळे २०२५-२६ च्या हंगामातील ऊसाला यापूर्वी पहिली उचल प्र.मे.टन रुपये ३०००/- दिल्यानंतर जून महिन्यात प्र.मे.टन रुपये १००/-ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामध्ये वाढ करून कार्यक्षेत्रातील ऊसाला रु.१५०/- व प्रोत्साहनपर अनुदान रु.५०/- असे एकुण २००/- प्र.मे.टन तसेच कार्यक्षेत्राबाहेर रु.१५०/- प्रमाणे ऊसबील दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व ऊस उत्पादकांचे बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यावेळी टाळ्यांच्या गजरात उपस्थित ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळेंच्या निर्णयाचे स्वागत केले.
कारखाना कार्यक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादन वाढावे व एकरी १०० मे.टन ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मागील वर्षी २०२५-२६ व २०२६-२७ या गळीत हंगामाकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पिक प्रकारात एकरी विक्रमी उत्पादन आधारित बक्षीस योजना जाहीर करण्यात आली होती. यामध्ये एकरी १०१ मे.टन व त्यापुढे उतपादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ७१,०००/-, ९१ ते १०० मे.टन साठी ५१,०००/-, ८१ ते ९० मे.टन साठी ३१,०००/- व ७५ ते ८० मे.टन साठी २५,०००/- रुपये प्रोत्साहनप्र बक्षीस ठेवण्यात आले होते. या बक्षीस योजनेत २०२५-२६ या गळीत हंगामात आडसाली पिक प्रकारात -दिलीप विष्णू भुसे (रवंदे) यांनी एकरी ८८.७५७ मे.टन व तुषार बबनराव बारहाते, (संवत्सर) यांनी एकरी ८४.४२८ मे.टन उत्पादन घेतल्यामुळे त्यांना ३१,०००/- रुपये व पूर्व हंगामी पिक प्रकारात-जमाल मेहबूब सय्यद (भरतपूर) यांनी एकरी ७७.९२२ मे.टन उत्पादन घेतल्यामुळे त्यांना २५,०००/- रुपये बक्षीस देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी केले. यावेळी विषय पत्रिकेवरील १ ते १० विषय सर्व सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात वर हात करून एकमताने मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन दिनार कुदळे यांनी मानले.याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा.चेअरमन दिनार कुदळे, तसेच माजी संचालक बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, कारभारी आगवण,नारायणराव मांजरे, बाबासाहेब कोते, ज्ञानदेव मांजरे, विश्वासराव आहेर, चंद्रशेखर कुलकर्णी, राजेंद्र गिरमे, आनंदराव चव्हाण,सुनील शिंदे, किसनराव आवारे,अॅड.विद्यासागर शिंदे, कचरू घुमरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर आदी मान्यवरांसह सर्व संचालक मंडळ तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक,पदाधिकारी, जिल्हा परिषद मा.सदस्य,पंचायत समितीचे माजी सभापती,उपसभापती,सदस्य,नगरपालिकेचे आजी माजी सदस्य कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.मतदारसंघातील जनतेने सलग दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली.या सात वर्षांत ५ नंबर साठवण तलाव, सावळी विहीर-कोपरगाव रस्ता, राज्य मार्ग ०७, देर्डे फाटा-भरवस फाटा, मंजूर बंधारा, वारी पूल यांसारखी अनेक अशक्यप्राय कामे पूर्ण करता आली याचे समाधान आहे. विकासकामांसाठी निधी मिळविण्याकरिता मुंबईपासून दिल्लीपर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मागील महिन्यात प्रकृती अस्वस्थ असतानाही जनतेच्या कामाला प्राधान्य देत दिल्ली गाठली आणि दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मात्र या कार्यक्रमात प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही वेळ बसून घेतले. ही बातमी समजल्यानंतर मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी नागरिकांनी फोन करून आपुलकीने विचारपूस केली. त्या क्षणी जाणवले की, मी विकासासाठी घेत असलेल्या कष्टांवर जनता मनापासून प्रेम करते. हे प्रेमच मला अधिक जोमाने काम करण्याचे बळ देणार आहे.-आमदार आशुतोष काळे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे, समवेत ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा.चेअरमन दिनार कुदळे, मान्यवर व संचालक मंडळ.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!