
कोपरगाव प्रतिनिधी
मतदार संघातील जनतेची वीज, पाणी, रस्ते किंवा विकासाची कोणतीही गरज पूर्ण करणे हे मी माझे कर्तव्य मी समजतो. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्तावाचा तोपर्यंत पाठपुरावा करतो जोपर्यंत त्या प्रयत्नांना निधी आणून प्रत्यक्ष कामात उतरवत नाही, हीच माझी कामाची पद्धत आहे. “मी फक्त बोलणारा नाही, तर करून दाखवणारा माणूस आहे; आणि फक्त आश्वासन देणारा नाही तर दिलेली आश्वासन पूर्ण करणारा, कामाचा माणूस आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते १९.२७ कोटी निधीतून झगडे फाटा ते पुणतांबा फाटा रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन,१.८६ कोटी निधीतून ५ एमव्हीए क्षमतेच्या चांदेकसारे सबस्टेशनचे भूमिपूजन, ५० लाख निधीतून बांधण्यात आलेल्या श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण,२० लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या मुस्लिम दफनभूमी संरक्षक भिंतीचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले की, पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटर रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःच्या चारचाकीतून रस्त्याची पाहणी घडवून आणली त्यावेळी १४ कोटी निधी मंजूर करून या रस्त्याचे काम पूर्ण केले.त्यानंतर २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर कोविडचे संकट असतानाही २०२० मध्ये निधी देवून या सात किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले. पुन्हा रस्ता खराब होवू नये यासाठी रस्ता फुटायच्या आत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून १९.२७ कोटी निधीतून हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा होत आहे. मात्र झगडे फाटा-वडगाव पान रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा केल्याशिवाय माझे समाधान होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.कुंभारी, रवंदे व वारी सबस्टेशनची क्षमता वाढवून, ब्राम्हणगाव येथे नवीन सबस्टेशन उभारले.खिर्डी गणेशला अतिरिक्त ट्रान्सफार्मर दिले. मा.आ.अशोकदादा काळे यांनी कोळपेवाडीला मंजूर करून आणलेले १३२ के.व्ही. सबस्टेशन २०१४ ला झालेल्या सत्तांतरामुळे जरी शहाला घालविले असले तरी या शहा १३२ के.व्ही. सबस्टेशनला पोहेगाव, कोळपेवाडी व चासनळी जोडून घेतले; ११२ नवीन ट्रान्सफार्मर व रोहित्र स्थलांतरासाठी ७ कोटी ४२ लाखांचा निधी मंजूर करून आणला, तर आणखी २७ ट्रान्सफार्मरसाठी १.५० कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे.११ गावांतील आदिवासी वस्त्यांसाठी १ कोटी १० लाखांतून वीज पोल व ट्रान्सफार्मरची कामे पूर्ण केली असून आणखी १२ ट्रान्सफार्मर मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगत रांजणगाव देशमुख सबस्टेशनला उभारण्यात येणाऱ्या सोलर प्लांटचे काम अंतिम टप्यात आले असून लवकरच त्याचे लोकार्पण होवून विजेच्या अडचणी निश्चितपणे कमी होणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी मुस्लिम दफनभूमी परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सहा.अभियंता वैभव वाजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुळशीराम दहिफळे, शाखा अभियंता रविंद्र चौधरी,महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे,उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, आदींसह चांदेकसारे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव-सावळीविहीर या महामार्गावर अनेक देवस्थाने व शैक्षणिक संकुल आहेत. कोपरगाव शहरातील वाढती वाहतूक, समृद्धी महामार्गाची रहदारी आणि अहिल्यानगर मनमाड रस्त्यावरची अवजड वाहतूक यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढली. शहरात उड्डाणपूल करून फारसा फायदा होईल असे वाटत नाही.भविष्याचा विचार करता कोपरगाव शहराला बायपास मार्ग तयार करणे गरजेचे आहे. हा बायपास झगडेफाटा मार्गे शिर्डी बायपासला जोडल्यास शहरातील ट्राफिक कमी होऊन अपघात टळतील, वाहतूक सुरळीत होईल आणि व्यवसाय वृद्धीला चालना मिळेल त्यामुळे सर्व गावांचा विकास होईल.त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे निधीची मागणी करणार आहे.-आ. आशुतोष काळे


