Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedहरिसन ब्रँचला पाणी कधी? शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव!!

हरिसन ब्रँचला पाणी कधी? शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव!!

उजव्या कालव्याचे आवर्तन महिनाभरापासून सुरू; उभी पिके पाण्याअभावी धोक्यात!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी उलटला, तरीही हरिसन ब्रँचच्या चारीला अद्याप पाणी न मिळाल्याने जेऊर कुंभारीसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. उभी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून, पाटबंधारे विभागाच्या पाणीवाटपाच्या नियोजनावर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राहता भागातील शेतकऱ्यांचे भरणे होत आले असून पाच व सहा क्रमांकाच्या चाऱ्यांनाही पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, हरिसन ब्रँचच्या चारीला अद्याप पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी दि. ९ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला.
यावेळी राहता उपविभागीय अधिकारी लव्हाट, शाखाधिकारी निरमळ, वैद्य व निलेश गायकवाड यांच्याकडे “हरिसन ब्रँचला पाणी नेमके कधी सोडणार?” असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. मात्र, पाणी सोडण्याची निश्चित तारीख सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आणखी संताप निर्माण झाला.
यावेळी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते म्हणाले, “उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू होऊन जवळपास महिना होत आला आहे. इतर चाऱ्यांना पाणी मिळत असताना हरिसन ब्रँचच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून, पाटबंधारे विभागाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने हरिसन ब्रँचला पाणी सोडावे. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.”
उपसरपंच जालिंदर चव्हाण म्हणाले, “हरिसन ब्रँचच्या चारीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज आहे. पाणी सोडण्याची निश्चित तारीखही अधिकाऱ्यांकडून सांगितली जात नसेल, तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे? प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घ्यावा आणि हरिसन ब्रँचला पाणी उपलब्ध करून द्यावे.”
राहता परिसरातील चाऱ्या भरल्या जात असताना हरिसन ब्रँचला पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी पाणीवाटपाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पिके वाचविण्यासाठी हरिसन ब्रँचला तातडीने पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच या प्रश्नाची कोपरगाव तालुक्याचे आमदार यांनी तातडीने दखल घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना कराव्यात आणि हरिसन ब्रँचला तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
पाणीवाटपाचे नियोजन करताना सर्व चाऱ्यांना समान न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांच्या पिकांचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, उपसरपंच जालिंदर चव्हाण, अशोक राऊत, कोंडीराम वक्ते, दामोदर वक्ते, साहेबराव वक्ते, नारायण गुरसळ, रमेश वक्ते, लक्ष्मण वक्ते, किरण वक्ते, करणा वक्ते, लहानू गायकवाड, मधुकर वक्ते, शरद होन, अण्णा होन, प्रकाश होन, भगवान जावळे, मोहन पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!