
कोपरगाव प्रतिनाधी
कोपरगाव शहरात नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता थेट संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारवाईच्या नावाखाली आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा काही व्यापारी बांधवांनी माध्यमांसमोर उपस्थित केली असून अजूनही काही व्यापारी बांधव लवकरच या बाबत जाहीरपणे भाष्य करणार आहे. त्यामुळे या अतिक्रमण मोहिमेत मोठ्या भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनिल गंगुले यांनी म्हंटले आहे.
कोपरगाव शहरात मागील काही दिवसांपासून नगरपरिषद प्रशासनाकडून शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र या मोहिमेत पारदर्शकता नसून दुजाभाव केला जात आहे. रस्त्याच्या कडेला हातावर पोट भरणाऱ्या छोट्या टपरीधारकांची दुकाने, हातगाड्या आणि छोटी अतिक्रमणे तातडीने जमिनीदोस्त केली जात आहेत. मात्र मुख्य बाजारपेठ आणि मोक्याच्या ठिकाणी मातब्बरांचे पक्के आणि मोठे अतिक्रमण हटवताना प्रशासनाने हात आखडते घेतले आहे. काही विशिष्ट अतिक्रमणांना अभय देण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी छुपी हातमिळवणी व मोठा आर्थिक व्यवहार झाले आहे का ? असा संतप्त सवाल सुनिल गंगुले यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.
काही व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई होऊ नये म्हणून नगरपरिषद सत्ताधाऱ्यांकडून पैशांची मागणी झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी माध्यमांसमोर सांगितले. महाराष्ट्रात कुठेही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू नाही अहिल्यानगर जिल्ह्यात देखील कोठेही अतिक्रमण काढले जात नाही मात्र अतिक्रमण हटाव मोहीम हि संपूर्ण जिल्ह्यात फक्त कोपरगाव शहरातच सुरु आहे. सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना धाक दाखवून त्यांच्याकडून पैसा लुबाडण्यासाठी तर ही अतिक्रमण मोहीम सुरू तर केली नाही ना? या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेबाबत मान. जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल करणार असून या बाबत सखोल चौकशीची मागणी करणार आहे. अतिक्रमण काढणे बाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र या अतिक्रमण मोहिमेत पैसे घेतल्याचा आरोप व्यापारी बांधव जाहीरपणे प्रसार माध्यमांच्या पुढे सांगत आहे हे अतिशय दुर्दैवी असल्याचे सुनिल गंगुले यांनी शेवटी म्हंटले आहे.


