
कोपरगाव प्रतिनिधी
कर्मवीर स्व. शंकरराव काळे व सौ. सुशीलामाई काळे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान देतानाच अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि धार्मिक परंपरेचीही निष्ठेने जोपासना केली. समाजकार्यासोबत अध्यात्म आणि नैतिक मूल्यांची सांगड घातल्यामुळेच काळे परिवाराचे कार्य समाजाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे ठरले आहे. हा समृद्ध धार्मिक वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी समर्थपणे पुढे नेला असून, त्याच परंपरेचे जतन आ. आशुतोष काळे करीत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. गोरखजी महाराज कुदळ यांनी केले.
माहेगाव देशमुख येथे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. गोरखजी महाराज कुदळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी उपस्थित राहून कीर्तन सेवेचा लाभ घेतला. त्यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तनाची दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प. गोरखजी महाराज कुदळ म्हणाले की, “अध्यात्म आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते. संसारात अधिकाधिक गुंतत गेलो की दुःख निर्माण होते; मात्र नामस्मरणात रंगल्यावर मनाला आनंद आणि समाधान मिळते. कलियुगात भगवंतप्राप्तीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. त्यामुळे घरातील थोरामोठ्यांनी लहान मुलांना बालपणापासूनच नामस्मरणाची गोडी लावावी.
कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी शिक्षण, सहकार, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य उभे करताना आपल्या संस्कृतीशी आणि अध्यात्माशी असलेले नातेही कायम जपले. वारकरी संप्रदायावरील त्यांची श्रद्धा तसेच विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांना त्यांनी दिलेले प्रोत्साहन त्यांच्या अध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे आहे. त्यांच्या या कार्यात सौ. सुशीलामाई काळे यांनी खंबीरपणे साथ दिली.
काळे परिवाराची ही धार्मिक आणि सामाजिक परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांनी समर्थपणे पुढे नेली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ.आशुतोष काळेही हा वारसा जपत आहेत. सेवेतून समाजकारण भक्तीतून अध्यात्म हि काळे परिवाराची समृद्ध परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक आणि सामाजिक कार्यासोबतच आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव मतदारसंघाने विकासाच्या विविध क्षेत्रांत भरीव प्रगती केली आहे. तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे काम सुरू असल्याचेही ह.भ.प.गोरखजी महाराज कुदळ यांनी सांगितले.यावेळी माहेगाव देशमुख तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


