
हजारो भाविकांची उपस्थिती; भक्तिरसात न्हाऊन निघाले जेऊर कुंभारी!!
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी गावातील धार्मिक व आध्यात्मिक परंपरेला उजाळा देणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत महाराज अनर्थे (भोजडकर) यांच्या रसाळ व ओघवत्या वाणीतून संगीतमय श्रीमद्भागवत कथेचे निरूपण होत असून, कथा श्रवणासाठी दररोज हजारो महिला-पुरुष भाविकांची उपस्थिती लाभत आहे.
श्रीमद्भागवत कथेच्या निरूपणातून भक्ती, ज्ञान आणि अध्यात्माचा सुरेख संगम अनुभवायला मिळत असून, कथा ऐकण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि कथाव्यासांच्या रसाळ वाणीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जात आहे.
कथा संपल्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या नियोजनबद्ध सहभागामुळे सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, विश्वात्मक जंगली महाराज ध्यानपीठाचे अध्यक्ष परमानंद महाराज,
जेऊर कुंभारी येथील महानुभव आश्रमचे संत लताबाई महानुभव,भारती महानुभव,संदीप महाराज महानुभव
यांनी श्रीमद्भागवत कथा स्थळी भेट देऊन या भक्तिमय सोहळ्याचा अनुभव घेतला. यावेळी त्यांनी जेऊर कुंभारी ग्रामस्थ तसेच भजनी मंडळाच्या धार्मिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी बोलताना परमानंद महाराज म्हणाले, “श्रीमद्भागवत कथा ही केवळ कथा नसून मानवाला जीवनाचा खरा मार्ग दाखविणारी आध्यात्मिक शिदोरी आहे. भागवताचे श्रवण केल्याने मनाला शांती मिळते, भक्तीची भावना दृढ होते आणि मानवजन्माचे सार्थक होते. जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून जपलेली धार्मिक व आध्यात्मिक परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामस्थ, भजनी मंडळ व भाविकांच्या एकजुटीमुळे निर्माण झालेले भक्तिमय वातावरण समाजाला सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. अशा धार्मिक उपक्रमांची परंपरा यापुढेही अखंड सुरू राहावी,” असे सांगितले.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे जेऊर कुंभारी परिसरातील धार्मिक परंपरेला नवी ऊर्जा मिळाली असून, सात दिवसांचा हा आध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माची पर्वणी ठरत आहे.


