
जेऊर कुंभारी वार्ताहर
उजव्या कालव्याला पाणी सोडून तब्बल ३० दिवसांचा कालावधी उलटत आला असतानाही हरिसन ब्रँचच्या चारीला अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. हरिसन ब्रँचचारीवर जेऊर कुंभारी , कोकमठाण, डाऊच, पानमळा या भागातील शेतकरी अवलंबून आहे सध्या शेतकऱ्यांनी पावसावर सोयाबीन मका कपाशी घेतली आहे.
पावसानेही दडी मारल्याने या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली असून, वेळेत पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हरिसन ब्रँचच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
हरिसन ब्रँच परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहेत. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना चारीला पाणी सोडण्यास होत असलेली दिरंगाई शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. एकीकडे पावसाने पाठ फिरवली असताना दुसरीकडे कालव्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
दरम्यान, शिर्डी व राहाता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे भरणे होत आले असून, वरच्या भागातील चारी क्रमांक ५ व ६ चाऱ्यांनाही पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, हरिसन ब्रँचच्या चारीबाबतच सातत्याने दुजाभाव का केला जात हरिसन ब्रँच चारीसाठी कोणी अधिकारी लक्ष देयला तयार नाही असा
आरोप महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केला आहे.
हरिसन ब्रँचच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळणे आवश्यक आहे. पाणी वितरणामध्ये कोणत्याही भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे संबंधित पाटबंधारे विभागाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन हरिसन ब्रँचच्या चारीला पाणी सोडावे, अशी जोरदार मागणी बाळासाहेब वक्ते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
“हरिसन ब्रँचच्या शेतकऱ्यांना वारंवार पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. इतर चाऱ्यांना पाणी मिळत असताना हरिसन ब्रँचला डावलणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. पिके हातची जाण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पाणी सोडावे,” असे वक्ते यांनी म्हटले आहे.


