
उशिरा आवर्तन मिळाल्याने पिकांचे नुकसान; पाटबंधारे विभागाने नुकसानभरपाई द्यावी!!- उपसरपंच जालिंदर चव्हाण
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील हरिसन ब्रँचच्या चारीला वेळेवर आवर्तन न मिळाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मका, सोयाबीन व कापूस ही उभी पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत. चिताळी परिसरात पाणी पोहोचून जवळपास महिना होत आला असतानाही हरिसन ब्रँचच्या चारीला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता या पिकांना पाणी मिळाले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
हरिसन ब्रँचच्या चारीवर जेऊर कुंभारी, कोकमठाण, चांदेकसारे, पानमळा व डाऊच परिसरातील शेतकऱ्यांचे क्षेत्र अवलंबून आहे.

सध्या या भागातील मका, सोयाबीन आणि कापूस ही पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपली आहेत. वेळेवर पाणी मिळाले असते तर पिके वाचविता आली असती; मात्र आवर्तनास झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
याबाबत उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पाटबंधारे विभागाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. हरिसन ब्रँचच्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक आवर्तनाच्या वेळी पाण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा लागतो. शेतकऱ्यांना वारंवार इरिकेशन बंगल्यावर जावे लागू नये, यासाठी पाणीवाटपाचे योग्य व नियोजनबद्ध वेळापत्रक असणे आवश्यक आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
आता पाणी सोडले तरी करपलेली पिके पुन्हा उभी राहणार नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी चव्हाण यांनी केली आहे.
तसेच हरिसन ब्रँचच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या आमदारांनी पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हरिसन ब्रँचच्या चारीला वेळेवर आवर्तन न मिळाल्याने झालेल्या नुकसानीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, पाणीवाटपाचे योग्य नियोजन करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.


