Sunday, August 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगाव बाजार समितीच्या सभापतींच्या अनागोंदी कारभाराविरोधात उपसभापतींसह सदस्यांचे सामूहिक राजीनामे; शेतकरी हितासाठी...

कोपरगाव बाजार समितीच्या सभापतींच्या अनागोंदी कारभाराविरोधात उपसभापतींसह सदस्यांचे सामूहिक राजीनामे; शेतकरी हितासाठी घेतला निर्णय!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान सभापतींकडून सुरू असलेला अनागोंदी कारभार, आर्थिक उधळपट्टी आणि शेतकरी हिताकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ उपसभापतींसह काही सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याची माहिती विद्यमान उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिली आहे.
उपसभापती गोवर्धन परजणे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. आमचे नेते आमदार आशुतोषदादा काळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हित जोपासले जावे या उद्देशातून आमच्यावर जबाबदारी दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या संस्थेचे हित जपणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र काही महिन्यांपासून बाजार समितीमध्ये उत्पन्नाचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च करण्यात येत असून आर्थिक शिस्त पूर्णपणे ढासळत चालली आहे. सभापतींच्या सुरु असलेल्या सध्याच्या अनागोंदी कारभारामुळे संस्था आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. या पापाचे भागीदार होण्याची आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला पदापेक्षा शेतकऱ्यांचे हित आणि संस्थेची प्रतिष्ठा महत्वाची आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी दर देणारी हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अधिकच्या चांगल्या उपाय योजना कशा पद्धतीने राबविल्या पाहिजे याचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे असतांना शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या योजनांवर खर्च करण्याऐवजी गरज नसलेल्या बाबींवर नको त्या ठिकाणी निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक शिस्तीला बाधा पोहोचत असून संस्थेची आर्थिक घडी विस्कटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या आणि बाजार समितीच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार असून यामध्ये सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा होती.
मात्र हा प्रकार थांबण्याऐवजी यामध्ये वाढ होत चालली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि बाजार समितीच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या कारभाराला आम्ही समर्थन देऊ शकत नाही. संस्थेची अधोगती होत असतांना पदावर राहून मुकाट्याने पाहत बसणे हे शेतकरी बांधवांशी बेईमानी ठरेल. त्यामुळे संस्थेच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्या निर्णयांचा भाग होवून अशा चुकीच्या कारभाराचे भागीदार होण्यापेक्षा आम्ही स्वखुशीने राजीनामा देण्याचा कठोर पण तितकाच आवश्यक निर्णय घेतला तो फक्त आणि फक्त शेतकरी आणि संस्थेच्या हितासाठी घेतला आहे असे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी स्पष्ट केले आहे. सभापती यांच्या कारभाराविरोधात विद्यमान उपसभापतींसह सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे बाजार समितीत मोठी खळबळ उडाली असून शेतकरी व व्यापारी वर्गातही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!