
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव आगारास पाच नवीन बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांसाठी दिलासादायक बाब आहे.कोपरगाव बस आगारात नव्याने पाच एस.टी. बस मंजूर झाल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता उपलब्ध बसची संख्या अपुरी पडत होती. यामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार मागणी लावून धरत कोपरगाव आगारासाठी नव्या बस उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून अखेर कोपरगाव आगारात पाच नवीन बस मंजूर झाल्या आहेत.
या नव्या बसमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा दिलासा मिळणार असून विविध मार्गांवरील बस फेऱ्यांमध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबद्दल मा.आ.स्नेहलताताई कोल्हे तसेच आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.


